पुणे – विनाकारण किंवा स्टंट करण्याच्या हेतुने रेल्वे प्रवासात ट्रेनमधील आपत्कालीन काळासाठी असलेली चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील आठ महिन्यात (एप्रिल ते नोव्हेंबर २०२३) मध्य रेल्वे विभागात ही कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वेतून प्रवास करताना जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास किंवा अपघात, आग लागली, अशावेळी प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये, अशा वेळी रेल्वे थांबविण्यासाठी अलार्म चेन ओढली जाते. परंतु काही प्रवासी किरकोळ किंवा मुद्दाम चेन ओढतात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. परिणामी गाडी थांबल्यामुळे मागच्या गाड्यांना उशीर होतो.
काही प्रवाशांना स्टेशनवर पोहचायला उशीर झाल्यामुळे गाडी थांबविण्यासाठी अलार्म चेन ओढले जातात. यामध्ये दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे एका महिन्यात १९७ गाड्या उशिराने धावल्या. यात मुंबई विभागात ७३ मेल/एक्स्प्रेस, भुसावळ-५३, नागपूर-३४, पुणे-३० आणि सोलापूर विभागात ८ गाड्यांना फटका बसला. अशा प्रवाशांवर रेल्वेच्या कायद्यानुसार कलम १४१ अन्वये कारवाई करण्यात आली.
दरम्यान, अनावश्यक आणि गैरकारणांसाठी संकटकालीन साखळीचा अवलंब करू नका, ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, दंडाची करवाई होऊ शकते. प्रवाशांनी कारण नसताना अलार्म चेन ओढू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.