मुंबई – अहमदनगर जवळ सिन्नर-शिर्डी महामार्गावर आज पहाटे साईभक्तांवर काळाने घाला घातला आहे. पहाटे सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेला या अपघातात 10 साईभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताचे भीषण स्वरुप पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेच्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. अपघात झाला त्यावेळी मोठा आरडाओरडा ऐकू आल्याचे येथे उपस्थित असल्याने सांगितले. ही बस मुंबईहून येत होती. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर हा अपघात झाला.