राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार यादीकडे आता लक्ष
भाजपच्या यादीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव आहे. त्यामुळे आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांच्या भाजप उमेदवारीची चर्चा अन् अपेक्षा संपुष्टात आली. नागवडे आघाडीकडून लढण्यास उत्सुक नसल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ आमदार राहुल जगताप यांच्याच गळ्यात पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यात पुन्हा एकदा पाचपुते-जगताप हीच लढत पहायला मिळण्याचे संकेत आहेत.
भाजपच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री पाचपुते यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जगताप आणि कॉंग्रेसच्या अनुराधा नागवडे यांच्या नावांची चर्चा रंगली होती. भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे आमदार जगताप, राजेंद्र, अनुराधा नागवडे हे गेल्या दोन दिवसांपासून निवडक कार्यकर्त्यांसह मुंबईत तळ ठोकून होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीचा “सस्पेन्स’ कायम होता. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत पाचपुते यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याने तेच भाजपच्या उमेदवारीचे मुख्य दावेदार मानले जात होते. अखेर भाजपच्या पहिल्या यादीत माजी मंत्री पाचपुते यांचे नाव झळकल्याने आमदार जगताप-नागवडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
भाजपची उमेदवारी पाचपुते यांना मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आघाडीकडून उमेदवारी करण्यास नागवडे कुटुंबीय उत्सुक नसल्याची खात्रीशीर समजते. त्याचबरोबर भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी आ. जगताप-नागवडे यांनी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे “लॉबिंग’ केल्याने राष्ट्रवादीतील एका गटाने आमदार जगताप-नागवडे यांच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा तगडा उमेदवार देता येईल का, याबाबत गांभीर्याने चाचपणी सुरू केल्याचे समजते. राष्ट्रवादीकडे आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार आणि ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांची देखील नावे विचाराधीन असल्याचे समजते. परंतु, “इलेक्टिव्ह मेरिट’च्या आधारावर आमदार राहुल जगताप यांनाच पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.
पाचपुते एका चिन्हावर लढणार दुसऱ्यांदा निवडणूक
माजी मंत्री बबनराव पाचपुते हे सन 1980 पासून विधानसभेच्या आखाड्यात आहेत. पाचपुते हे प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर लढल्याचा त्यांचा इतिहास आहे. 2014 च्या निवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर लढले होते, यावेळी देखील ते पुन्हा कमळ या चिन्हावरच लढतील, हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे ते पहिल्यांदाच एकाच चिन्हावर दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहेत.