नवी दिल्ली – कर्नाटकातील मौलवी सैय्यद तन्वीर हाश्मी यांचे आयएसआय सोबत संबंध आहेत काय याची चौकशी करावी अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. कर्नाटकातील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी हाश्मी यांच्या बरोबर मुख्यमंत्री सिद्धरामैया एका व्यासपीठावर हजर होते असा आरोप केला आहे. त्यावर सिद्धरामय्या म्हणाले की, यत्नाळ यांनीच सैयद तनवीर हाश्मीसोबतची मैत्री उघडपणे मान्य केली आहे.ते त्यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.
मौलवी तनवीर हाश्मीच्या आयएसआयएसशी संबंध असल्याच्या दाव्यांमध्ये काही तथ्य असल्यास, पंतप्रधानांनी सखोल चौकशीचे आदेश देणे आणि संबंधित तपशील उघड करणे अत्यावश्यक आहे. तसे न केल्यास असे खोटे आरोप करणाऱ्या यत्नाल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री या आठवड्याच्या सुरुवातीला उत्तर कर्नाटकातील हुबळी येथे एका कार्यक्रमात हाश्मी यांच्या बरोबर एका स्टेजवर उपस्थित होते असे यत्नाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आव्हान हाश्मी यांनीही केंद्र सरकारला दिले आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. माध्यमांच्या एका वृत्ताचा हवाला देत मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, भाजप आमदाराचे यत्नाळ यांचेच हाश्मी यांच्या कुटुंबाशी व्यावसायिक संबंध असल्याचे उघड झाले आहे.
यत्नाळ यांच्या म्हणण्यानुसार तनवीर हाश्मीचे आयएसआयएसशी संबंध आहेत, तर त्याचा व्यावसायिक भागीदार असलेल्या भाजप आमदाराला त्याची माहिती नव्हती का? गप्प बसण्याचे कारण काय? याचीही केंद्राने चौकशी केली पाहिजे असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.