– वंदना बर्वे
नवी दिल्ली — प्रवास करण्यासाठी निघताना प्रत्येक जण फार उत्साही असतो. मात्र ज्या मार्गावरून तो प्रवास करणार असतो तो किती सुरक्षित आहे की नाही, याचा विचार प्रवाशांनी आधी करायला हवा, अशी परिस्थिती राष्ट्रीय महामार्गावरून अपघाताला बळी पडणाऱ्या आकडेवारीवरून निदर्शनास येते.
राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांची संख्या आणि अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. यानंतरही गाड्यांचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांची संख्या कमी करण्यात मंत्रालयाला पाहिजे तेवढे यश आले नसल्याची खंत व्यक्त केली.
मागील दोन वर्षांत महामार्गावरील अपघातांची संख्या वाढते आहे. 2021 मध्ये चार लाख 12 हजार 432 अपघाताची नोंद करण्यात आली होती. 2022 मध्ये मात्र अपघातांची संख्या वाढली आहे. 2022 मध्ये चार लाख 61 हजार 312 अपघाताच्या घटना घडल्यात. अपघात कमी होण्याऐवजी त्यात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
दुर्दैवाची बाब अशी की, 2021 मध्ये एक लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला. यानंतर 2022 मध्ये झालेल्या अपघातात एक लाख 68 हजार 491 जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. महत्वाचा मुद्या असा की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत असताना लोकांकडून गाड्यांचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे, यावरही गडकरी यांनी आश्चर्य व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्या एक्सप्रेस महामार्गावर 100 ते 120 किलोमीटर ताशी वेगाने गाडी चालविण्याची परवानगी आहे. मात्र, वेगाची ही मर्यादा वाढवून ती 140 ते 160 किलोमीटर ताशी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या परवानगी नसली तरी लोकांकडून दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर 140 किलोमीटर किंवा 160 किलोमीटरच्या वेगाने गाडी चालविली जात असल्याचे दिसून आले आहे.
नागरिकांना गाडी निश्चित वेगाने चालविण्याचे आवाहन करीत गडकरी यांनी यावेळी अपघातामुळे 3.14 टक्के जीडीपीचे नुकसान होत असल्याचेही सांगितले. यातही सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 67 टक्के मृत्यू 18-45 वयोगटातील होत आहेत.
गेल्या नऊ वर्षांपासून मंत्रालय अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरीसुध्दा अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, गाडीचालकांनी कायद्याचे पालन करायला पाहिजे. लेनची शिस्त पाळणे, ड्रायव्हिंग लायसन्स असणे, वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलू नये, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.