क्रांती रिक्षा संघटनेची मागणी : आंदोलनाचाही इशारा
पिंपरी – करोना महामारीमुळे शहरातील रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे हातावर पोट आहे. त्यामुळे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ओला, उबेर व जुगनू यासारख्या खासगी कंपन्या बंद करून सरकारने स्वतः त्याच धर्तीवर ऍप सुरु करावे, अशी मागणी क्रांती रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर काळे यांनी केली आहे. त्याबाबत आकुर्डी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
निवदेनामध्ये म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे, असे असताना रिक्षाचालकांने घर कसे चालवायचे असा प्रश्न आहे. अनेक रिक्षा संघटनांनी रिक्षाचालकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती. सरकारने स्वतःचे ऍप तयार करावे. आमच्या रिक्षा ताब्यात घेऊन आम्हाला त्या कंपनीमध्ये कायमचे काम द्यावे. त्यामुळे रिक्षाचालकांचा रोजीरोटीचा प्रश्न कायमचा मिटेल.
करोनाच्या संकटामध्ये तात्पुरता दिलासा देण्यासाठी सरकाने अर्थिक पॅकेज जाहीर करावे. रिक्षांचे कर्ज माफ करावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाची थकीत कामकाजासाठी 12 महिन्याची मुदत द्यावी. अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. तसेच मागण्यांचा सहानुभूतीने विचार न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा क्रांती सेनेने दिला आहे.