मुंबई – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र कार्यकर्त्यांची आणि नेतेमंडळींच्या मागणीनंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली आणि सर्वत्र चर्चांवर पडदा पडला. मात्र यातच आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’ अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार पक्ष पुढे नेणारा वारसदार निर्माण करू शकले नाहीत. त्यात शरद पवार अपयशी ठरले असल्याचे सामनामध्ये लिहिले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी संजय राऊतांवर संताप व्यक्त केला आहे.
“शरद पवार साहेबांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. असं असताना संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावेत, असे त्यांना वाटते का?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
पुढे भुजबळ म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यासह अनेक नेते काम करण्यास समर्थ आहेत. या नेत्यांवर जी जबाबदारी टाकली जाईल, ती समर्थपणे पेलण्याची ताकद या नेत्यांमध्ये आहे. तुमचं जेवढं वय आहे, तेवढं शरद पवार यांचे राजकारण आहे. इतकं लक्ष त्यांनी शिंदे गटावर आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” असा टोलाही भुजबळ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. यातून महाविकास आघाडीत मतभेद होत असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
काय लिहिले ‘सामना’ अग्रलेखात ?
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार हे समीकरण आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. पवार यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाहीत. त्यात शरद पवार अपयशी ठरले आहेत, असे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.