खर्च अशक्य झाल्याने व्यवसायाला राम-राम
पिंपरी – गेल्या तीन महिन्यांपासून करोनाने संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली आहे. काही व्यावसायिकांनी या काळात चांगलेच स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. परंतु जे व्यवसाय बंद होते त्यांना मात्र व्यवसायाला राम-राम ठोकण्याची वेळ आली आहे. अनेक व्यवसाय भाड्याच्या दुकानात सुरू आहेत. त्या व्यावसायिकांनी गेल्या एक महिन्यापासून दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमध्ये काही मोजके व्यवसाय सोडले अन्य सर्व व्यवहार ठप्प होते. उत्पन्न पूर्णपणे बंद असताना खर्च मात्र सुरुच होते. हे खर्च करणे लहान दुकानदारांसाठी अशक्य होत असल्याने अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. दुकानाचे भाडे, न वापरताच येणारे भरमसाठ विजेचे बिल, कामगारांचा पगार हे खर्च उत्पन्न बंद असल्याने अवाढव्य वाटत होते.
लॉकडाऊनची सर्वांत अधिक झळ ब्यूटी पार्लर, ट्रॅव्हल एजन्सी, ड्रायव्हिंग क्लास, कपड्याची दुकाने, स्नॅक्स सेंटर, हॉटेल्स अँड रेस्टॉरेंट यांना सोसावी लागली. कपड्याची दुकाने उघडण्यास आणि केवळ पार्सलसाठी हॉटेल्स उघडण्यास परवानगी मिळाली असली तरी सध्या सर्वांचीच आर्थिक स्थिती बिघडली असल्याने व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे. यामुळे लॉकडाऊनने बंद झालेले अनेक व्यवसाय अनलॉक होऊच शकले नाहीत.
शहर व उपनगरात सर्व ब्यूटी पार्लर महिलाच चालवितात. तसेच अनेक ठिकाणी स्नॅक्स सेंटर आणि चौपाट्यांवर वेगवेगळे खाद्य पदार्थ विकण्यात तसेच लेडी शॉपी व इतरही व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग दिसून येत होता. मोठ्या उमेदीने आणि कष्टाने सुरु केलेल्या व्यवसायांमधून त्यांना सध्या तरी काढता पाय घ्यावा लागत आहे.
हे खर्च ठरले कारणीभूत
सरकारने सांगितल्याप्रमाणे पहिला एक महिना अनेक दुकानमालकांनी भाडे घेतले नाही. परंतु नंतर मात्र भाड्यासाठी तगादा सुरु केला. अनेक दुकानमालकांचे मुख्य उत्पन्न भाडेच असल्याने त्यांनी भाडेकरुंकडे तगादा लावला. त्याशिवाय दुकाने बंद असूनही महावितरणने मात्र भरमसाठ विजेची बिले आकारली. कामगारांना थोडा का होईना पगार देणे भाग होते. थोड्याशा भांडवलावर सुरू केलेले व्यवसाय हातात पुरेसे पैसे न उरल्याने बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
हॉटेल, सलून, रिक्षाचालक आदींचे व्यवसाय सध्या अडचणीत आहेत. रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. भांडी घासणाऱ्या महिलांना देखील काम मिळत नसल्याची परिस्थिती आहे. दुकानदारांचे बॅंकेचे हप्ते, दुकानाचे भाडे थकले आहेत. व्यावसायिकांच्या दृष्टीने सध्या परिस्थिती गंभीर आहे. राजकीय लोकांना त्याचे गांभीर्य नाही.
– गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशन