औरंगाबाद : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आत्महत्या केली आहे मंत्र या आत्महत्येचे कारण मात्र सर्वांना धक्का देणारे असल्याचे दिसून येत आहे. आपली उंची कमी असल्याचा सतत विचार करुन ही तरुणी तणावाखाली आणि यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्चना विजयकुमार यादव असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. मूळ उत्तर प्रदेशचे असलेले यादव कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. तर, अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. सोमवारी अर्चना आईसोबत घरीच होती. रात्री आठ वाजता अर्चना खोलीत गेली. साडेआठ वाजण्याच्या सुमारास आईने हाका मारुनही खोलीतून प्रतिसाद येत नसल्याने आईने खोलीकडे धाव घेतली. तेव्हा अर्चना गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अंमलदार विष्णू जगदाळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्चनाचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.
अर्चना आपल्या आई-वडिलांसह सातारा परिसरात राहत होती. तिला एक विवाहित बहीण, दोन भाऊ आहेत. पोलिसांनी विचारपूस केली, तेव्हा अर्चनाने कमी उंचीमुळे हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला. तसेच आपली उंची कमी असल्याने अर्चना नेहमी तणावात असायची अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिल्याची पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून,पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू जगदाळे तपास करत आहेत.