नवी दिल्ली : सापाने दंश केल्याने भावाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा देखील सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेत असताना सापाने त्यांना दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे दुर्दैवी घटना घडली असून, दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अरविंद मिश्रा यांचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. त्यांचा भाऊ गोविंद मिश्रा अंत्यविधीसाठी गावात आला होता. मंगळवारी सापाने दंश केल्याने त्याचेही निधन झाले.
“झोपेत असताना गोविंदला सापाने दंश केला. त्यांचा एक नातेवाईकदेखील त्या खोलीत झोपला होता. त्यालाही सापाने दंश केला,” अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. गोविंदला रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याची प्रकृती गंभीर होती असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलाश शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, मदतीचे आश्वासन दिले आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.