मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे गटाची ताकद वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून अनेकजण शिंदे गटात सामील होत आहेत.फूट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत सवाल उपस्थित केले होते. अशात शिवसेनेसाठी सोलापुरातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आज राज्याच्या १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागत आहे. यात सोलापूरमधील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. ज्यात चिंचपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यात शिवसैनिकांना यश आलं आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने सर्व सात पैकी सात जागा जिंकत ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता ग्रामपंचायतीची सत्ता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे गेली आहे.फूट पडल्यानंतर शिवसेनेसाठी काहीसा हा सुखद धक्का आहे.