मुंबई : राज्यात कोरोनाच्या तब्बल 2190 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56,948 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत 1897 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी 1168 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता. तो आज 14.7 दिवस झाला आहे.
काल झालेल्या 105 मृत्यूपैकी 32 जण मुंबई, ठाण्यात 16, जळगाव 10, पुण्यात 9, नवी मुंबई, रायगड 7, अकोला 6, औरंगाबाद 4, नाशिक, सोलापूर 3, सातारा 2, तर अहमदनगर, नागपूर, नंदूरबार, पनवेल, वसई विरारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.5 टक्के एवढे आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 3 हजार 976 नमुन्यांपैकी 56,948 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 701 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 37 हजार 761 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 17, 918 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या सुमारे 12.4 टक्के तपासणी राज्यात झाली असून दर दहा लक्ष लोकसंख्येमागे राज्यात 3142 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर 2363 एवढे आहे.