मुंबई – “खोटं बोल, पण रेटून बोल’ हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.
महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहीत आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र, सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तासन्तास बैठका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढ्या बैठका करोनाविरोधातली लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती.
खरं बोलायचं असेल तर एकच माणूस पुरेसा असतो. मात्र, फेकमफाक करायची असेल तर तीन माणसं लागतात. अशाच प्रकारे तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे विसंगत माहिती देऊन माझ्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले.