200 पदाधिकाऱ्यांनी दिले अचानक राजीनामे
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिले आहेत. एरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबईतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि विभाग प्रमुखांचा समावेश आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रामुळे शिवसेनेला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदार संघातून भाजप गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे ऐरोलीमध्ये देखील तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. ऐरोली मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याने नाराज होत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये कोण किती जागा लढवणार याची घोषणा न करता महायुतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. महायुतीची घोषणा जरी झाली असली तरी कोणती जागा कोण लढवणार याबाबतचा तिढा कायम आहे.