शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद उफाळल्याने आज शिर्डीत नागरिकांनी व व्यावसायीकांनी बंद पाळल्याने भाविकांचे हाल झाले. बंदमध्ये खासगी प्रवासी वाहतूकदार सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसमध्ये मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी नागरिकांच्यावतीने भाविकांसाठी चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना थोडा दिलासा मिळाला.
खासगी वाहतुकदारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने सर्व बोजा एसटी महामंडळावर पडला. महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे बस खचाखच भरून जात होत्या. रात्री 12 वाजेपासून शिर्डी बंद झाल्याने भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक भक्तांनी उपाशीपोटी परतीचा रस्ता धरला. सकाळी भक्तांचे होत असलेले हाल पाहून शिर्डी ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींनी विविध ठिकाणी चहा, नाश्ता देऊन भक्तांना मदत केली. सहा वाजता शिर्डीतील गर्दीचा ओघ बऱ्या पैकी ओसरलेला दिसत होता.
सर्व दुकाने बंद असल्याने भाविक रिकाम्या हाताने दर्शनाला जात होते. मंदिरातही समाधीवर हार-फुलांचा ढीग दिसत नव्हता. अनेक भाविक चुकल्या सारखे दर्शन घेऊन बाहेर पडत होते. दर्शन रांगेत संस्थानकडून भक्तांना सुविधा पुरविल्या जात होत्या. तसेच संस्थान सोसायटीच्या दुकानात काही साहित्य भाविकांना मिळत होते.
बंद मुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून संस्थांनने पूर्ण तयारी केली होती. रात्री 1 वाजेपासून नाश्ता पाकिटांची तयारी सुरू केली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत 23 हजार नाष्टा पाकिटांची विक्री संस्थानने मंदिर परिसर, भक्त निवास, प्रसादालय व द्वारावती या परीसरात केली. रोज 10 वाजता सुरू होणारे प्रसादलय आज सकाळी 9 वाजताच सुरू केले. दिवसभरात 80 हजार भाविक जेवण घेऊ शकतील याचे नियोजन करून रात्री 11:30 पर्यंत याची वेळ वाढविली. भक्तांची गैरसोय होणार नाही, याची काळजी संस्थान प्रशासनाने घेतली.