नगर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांतील, आज अखेर आचारसंहितेच्या नियंत्रण कक्षात ४७ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत. केवळ १९ तक्रारींमध्ये तथ्य आढळले. जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील आचारसहिताभंगाच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाकडे एकूण ७२ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कक्षाकडे त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या सी- व्हिजिल मोबाइल अॅपमार्फत तक्रार प्राप्त झाल्यानंतर भरारी पथकामार्फत घटनास्थळी जाऊन कारवाई केली जाते.
दि. १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर राजकीय स्वरूपाचे फलक, बॅनर, प्रतिमा हटवण्यासाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी ते हटवण्याची कार्यवाही सुरू केली.
नगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या तालुक्यांतील २० हजार ३५४ फलक, झेंडे, प्रतिमा हटवण्यात आल्या, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर नेवासा या तालुक्यांतून १४ हजार ३९६ फलक, झेंडे हटवण्यात आले.
तसेच आचारसंहिताभंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. या कक्षात तक्रारीची नोंद करता येईल. त्याची तातडीने दखल घेऊन निराकरण करण्यात येत आहे, असे किरण देवतरसे तहसीलदार यांनी सांगितले.