शिक्रापूर -सध्या शाळकरी मुलांमध्ये फिल्मी स्टाइलने भांडणे करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक वादविवाद होत असून अशा पद्धतीने भाईगिरी करणाऱ्या शालेय मुलांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने चांगलाच झटका देत मुलांच्या पालकांना बोलावून समज दिली आहे.
शिक्रापूर येथून अनेक शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी अनेक मुले येत असतात. मुलांचे वय कमी असताना तसेच वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसताना मुले वाहने चालवितात. मुलांमध्ये वाद झाल्यास त्या वादाचे रुपांतर मुले फिल्मी स्टाइलमध्ये करुन त्याचे रुपांतर मोठ्या भांडणामध्ये करुन घेत असतात अशाच पद्धतीने मंगळवारी सकाळच्या सुमारस शालेय मुलांची शाळेसमोर भांडणे झाली; मात्र काही वेळाने मुलांनी पाबळ चौकात गर्दी करुन पुन्हा भांडणे करण्याचे ठरविले.
याबाबतची माहिती शिक्रापूर पोलिसांना समजताच सहायक निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, पोलीस नाईक हेमंत कुंजीर, कृष्णा व्यवहारे यांसह आदींनी या ठिकाणी धाव घेत मुलांचा भांडणाचा डाव उधळून लावला.
दरम्यान पोलिसांची गाडी आल्याचे दिसताच येथील मुलांनी वाहने जाग्यावर सोडून पळ काढला मात्र पोलिसांनी काही मुलांना पकडून त्यांना पोलीस स्टेशन येथे आणत तेथील वाहने पोलीस ठाण्यात नेली. मुलांच्या पालकांना बोलावून घेतले; परंतु पोलिसांच्या तत्परतेने मुलांच्या भांडणाचा डाव उधळला असून शालेय मुलांनी देखील चांगलाच धसका घेतला आहे.
शिक्रापूर येथे मुलांच्या भांडणाबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही तेथील मुलांसह काही वाहने ताब्यात घेतले होती. घटनेची संपर्ण चौकशी करत शालेय मुलांच्या पालकांना बोलावून घेत त्यांना समज देण्यात आली.
-रणजीत पठारे, सहायक पोलीस निरीक्षक