लखनौ –उत्तर प्रदेश विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान तोंडावर असताना कॉंग्रेसनेही उत्तर प्रदेशासाठीचा आपला निवडणूक जाहीरनामा आज प्रकाशित केला. उन्नती विधान नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेसने या आधी युवकांसाठी भर्ती विधान नावाने तसेच महिलांसाठी शक्ती विधान नावाने दोन स्वतंत्र जाहीरनामे या आधीच प्रकाशित केले आहेत.
आजच्या या जाहीरनाम्यात आपले सरकार सत्तेवर आल्यास पहिल्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. राज्यातील विजेचे बिल निम्मे केले जाईल, 20 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, महिलांना सरकारी नोकरीत चाळीस टक्के आरक्षण दिले जाईल, आजारी लोकांच्या उपचारासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातील आदि आश्वासने देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी गोधन न्याय योजना सुरू केली जाणार असून त्यात पशूंचे शेण सरकार दोन रुपये किलो दराने खरेदी करेल असेही आश्वासन देण्यात आले आहे. अशा स्वरूपाची एक योजना कॉंग्रेसने छत्तीसगड राज्यात यशस्वीपणे राबवली आहे असे त्यांनी म्हटले आहे. कृषी उत्पादनांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचे आश्वासनही यात देण्यात आले आहे.