शेवगाव – शेवगावला घडलेली दुर्घटना निषेधार्ह आहे. घटनेतील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. मलाही थोडा वेळ द्या. येत्या दहा दिवसांत सर्व प्रश्न सोडवतो, असा विश्वास देत गेले तीन दिवस शेवगावकर करत असलेला कडकडीत बंद आटोपता घ्यावा, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.
छत्रपती संभाजीराजे जयंतीच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेसंदर्भात खा. डॉ. विखे काल (बुधवार) येथे आले असता खालची वेस मारुती मंदिरात प्रशासन, व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी शेवगाव दुर्घटनेचा संपूर्ण आढावा घेतला. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर व्यापारी शिष्टमंडळ, तसेच मान्यवरांना येत्या दहा दिवसांत त्यांच्या सर्व मागण्यांवर समाधानकारक उत्तर दिले जाईल, असे त्यांनी आश्वासित केले.
खा. विखे म्हणाले की, पोलीस विभाग या घटनेची सखोल चौकशी करीत असून, दोषी आढळणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक केली जाईल. आज सायंकाळी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनाही शेवगावातील कायदा व सुव्यवस्थेसंबंधी भेटणार असून, आज (गुरुवार) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली जाईल.
या वेळी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सुनील रासने, डॉ. नीरज लांडे, अशोक आहुजा, कमलेश गांधी, मयूर पिसाळ, जगदीश धूत, अमोल साबळे, नितीन दहिवाळकर, चैतन्य देहाडराय, तुषार पुरनाळे, गणेश कोरडे, विनोद मोहिते यांच्यासह व्यापारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर खा. विखे यांनी शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, तहसीलदार छगन वाघ व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची बैठक घेऊन त्यांनाही विशेष सूचना केल्या.
काल (बुधवार) सकाळी मुस्लिम अल्पसंख्याक महिलांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नावे एक निवेदन देऊन पोलीस मुख्य आरोपींना सोडून निर्दोषांविरुद्ध कारवाई करतात. घरामध्ये शिरून तपासाच्या नावाखाली महिलांचा अपमान करतात. शिवाजी महाराज चौकातील मशिदीची तोडफोड केली. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे नियोजक व त्यांचे साथीदार, तसेच त्यांनी आसपासच्या शहरांमधून बोलावलेले माथेफिरू जबाबदार असताना, त्याची माहिती सर्व पोलिसांना असताना प्रतिकार करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या काही लोकांनाच फक्त निशाणा करून अटक केली आहे.
तपासाच्या नावाखाली जबरदस्ती घरामध्ये शिरून वेळप्रसंगी दरवाजे तोडून मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या महिलांचा अपमान केलेला आहे. त्यांच्यासोबत महिला पोलीससुद्धा नसतात. तसेच आमच्या निर्दोष मुलांनासुद्धा त्याचा काही एक संबंध नसताना पकडून नेत आहेत. तरी संबंधित संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा, तसेच आमच्या निर्दोष मुलांना त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांची शोध मोहिम जोरात
सीसीटीव्ही फुटेच्या आधारे दगडफेकीतील 13 आरोपीना पोलिसांनी आज अटक केली असून त्यांना न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.