मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी कर्नाटकातील विजयावर काँग्रेसचे सुरुवातीला अभिनंदन केले. यावेळी बोलताना, “अलिकडच्या काळात भाजपाकडून इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र वापरलं आह. कर्नाटकातही त्यांनी हेच केलं. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंनी केलं, तेच तिथे झालं. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केलं. गोव्यातही भाजपाचं बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करून राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलं आहे”, असे शरद पवार म्हणाले.
“यश-अपयश समजू शकतो. पण कर्नाटकात भाजपाचा सपशेल पराभव करण्याची भूमिका तिथल्या जनतेनं घेतली होती. मी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन करतो. त्यांनी भाजपाला धडा शिकवला. आता ही प्रक्रिया देशभरात होईल. आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं राज्य नाही. त्यामुळे बहुसंख्य राज्यात भाजपा सत्तेच्या बाहेर आहे. २०२४च्या निवडणुकीत काय चित्र दिसणार आहे, याचा एक अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो”, अशी भूमिका यावेळी शरद पवारांनी मांडली.
दरम्यान, पुढे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमध्ये दिलेल्या ‘बजरंग बली की जय’ घोषणेचा समाचार घेतला. “धर्म आणि जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळी त्याच्यात यश येतं. पण लोकांना हे आवडत नाही. बजरंग बली की जयचा मुद्दा निवडणुकीत काढण्याचं कारण नव्हतं. धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असल्याची शपथ आम्ही संसदेत घेतली. पण अशी शपथ घेतलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीनं अशी घोषणा करणं शोभत नाही. ते काम त्यांनी केलं. त्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे”, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
‘कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली तर दंगल होईल’, असे विधान अमित शाह यांनी केले होते. त्यावरूनही शरद पवारांनी टीका केली. “गृहमंत्र्यांनी तारतम्य राखून बोलायचं असतं. दंगल देशात कुठेच होता कामा नये. कुणाचंही सरकार असो. कारण त्याची किंमत देशाला आणि सामान्य माणसाला चुकवावी लागते. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे ही दमदाटीच आहे. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. लोकांनी त्याची नोंद घेतली आणि त्याचा तीव्र निकाल लोकांनी दिला आहे”, असे शरद पवार म्हणाले.