Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता “कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले’’, असा प्रश्न थेट सवाल केला होता. त्यांच्या याच प्रश्नाला आज शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी,”पंतप्रधान हे पद संस्थात्मक, त्याची प्रतिमा राखायला हवी, पदाची प्रतिमा राखून त्यांनी जी माहिती दिली, ती वस्तुस्थितीपासून फारच दूर आहे, असे मोदींवर टीकास्त्र डागले आहे. पुढे बोलताना त्यांनी, “दोन दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी साईबाबाच दर्शन घेतल्यानंतर कृषी खात्याबाबत काही मुद्दे मांडले. त्यांनी जी माहिती दिली ती वस्तुस्थीतीपासून दूर आहे. पंतप्रधान हे पद संस्थात्मक आहे. त्याची प्रतिमा राखायला हवी असं मला वाटतं. या पदाची प्रतिमा राखून त्यांनी जी माहिती दिली. त्याबाबत मी बोलणार आहे,” असे त्यांनी म्हटले.
पवार यांनी बोलताना आपल्या कृषिमंत्रि पदाच्या कार्यकाळाचा लेखाजोखाच मांडला. 2004 ते 2014 कृषीमंत्री मी होतो. 2004 ला देशात अन्न धान्य टंचाई होती. त्यावेळी पहिल्याच दिवशी कटू निर्णय मला घ्यावं लागला. अमेरिकेकडून गहू आयात करायला लागला. 2 दिवस मी त्या फाईलवर सही केली नव्हती. मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर मनमोहन सिंह यांचा फोन आला. 3 ते 4 आठवड्यात आपल्या समोरं अडचण येऊं शकते, असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं मी सही केली.”
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
* २००४ ते २०१४ मध्ये गहू, तांदूळ, कापूस, सोयबीनच्या हमीभावात दुपटीनं वाढ केली.
* ऊसाची किंमत ७०० होती. ती २१०० केली.
* यूपीए सरकार असताना काही योजना सुरू केल्या. ‘नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन’ सुरू केलं. यातून फळबाग आणि भाजीपाला उत्पादन वाढवलं.
* २००७ साली आलेल्या ‘राष्ट्रीय कृषी योजने’मुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला गेला.
* अन्य धान्याबद्दल काही ठराविक राज्यांचा उल्लेख व्हायचा. बिहार, आसाम, छत्तीसगड, झारखंड, ओडीस राज्यांत भात उत्पादन कमी प्रमाणात व्हायचं. त्यामुळे तिथे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले.
* मत्सपालन वाढीसाठी राष्ट्रीय मत्सपालन बोर्डाची स्थापना केली.
* राबवलेल्या योजनांमुळे देश अन्नधान्याच्याबाबात स्वयंपूर्ण झाला.
* एकेकाळी आयात करणार देश निर्यातदार झाला. २००४ ते २०१४ या काळात ७.७ अब्ज डॉलरवरून ४२.८४ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली.
* माझ्या काळात शेततळ्याची योजना आणली.
* शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ६२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली.
* पीक कर्जासाठी १८ टक्के व्याज आकारण्यात येत होते. ते ४ टक्क्यांवर आणलं. काही जिल्ह्यात ० टक्के व्याज आकारलं गेलं.
* नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सवलत दिली.
* २०१२-१३ साली दुष्काळ पडला होता. तेव्हा चारा छावण्या उभ्या केल्या.
* माझ्या कार्यकाळातील कामाची दखल आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली.