पुणे : “माणसाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आरोग्य आणि शिक्षण हेच दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी ओळखले होते. निम्हण यांनी राजकारणात करत असताना समाजकारणाचा भाग सोडला नाही. देतो तो देव, राखतो तो राक्षस या म्हणीप्रमाणे निम्हण गरजूंना मदत देत राहिले. त्यांचा वारसा सनी निम्हण यांनी चालू ठेवला असून ही कौतुकाची बाब असल्याच्या भावना ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. शां.ब मुजुमदार यांनी व्यक्त केल्या.
सोमेश्वर फाउंडेशन तर्फे दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ‘विनायकी’ विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीचे वाटप, बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुजूमदार होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर, पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर,आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अतुल बेनके, आमदार सत्यजित तांबे, माजी मंञी सुरेश नवले उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विचाराप्रती श्रध्दा, निष्ठा असेल तर माणूस मृत्यूनंतरही जिवंत असतो हे समाजकार्यातून दिसून येते,” अशी भावना यांनी व्यक्त केली.
तर आबांनी दिलेली शिकवण, त्यांच्या समाजकार्याचा वारसा वसा म्हणून, पुढे चालू ठेवत आहोत. कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने, अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत हे शिष्यवृत्ती वाटपाच्या निमित्ताने लक्षात आले.
सर्वांना चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य मिळावे यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य अविरतपणे चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक सनी निम्हण यांनी प्रास्ताविकात दिली. सुत्रसंचलन मिलिंद कुलकर्णी व अमित मुरकुटे यांनी केले तर आभार उमेश वाघ यांनी मानले.