पिंपरी – सध्या काही विघ्नसंतुष्ट प्रवृत्तीचे लोक सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय प्रतिकं, महामानव यांच्या विषयी अपशब्द वापरून समाजात असंतोष निर्माण करीत आहेत. अशा प्रवृत्तीपासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
भागवत वारकरी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 31) शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. शिष्टमंडळात कैकाडी महाराज यांचे वंशज, मठाधिपती भारत महाराज भारत महाराज घोगरे गुरूजी, दु:शासन क्षीरसागर महाराज, देवराम कोठारे महाराज, तुकाराम महाराज घाडगे, सुरेश महाराज भालेराव, निखिल महाराज घाडगे, सतीश महाराज काळे, राजू महाराज भुजबळ, कल्याण महाराज काळे यांचा समावेश होता.
पवार म्हणाले, शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना सोबत घेऊन रतेचे राज्य निर्माण केले. संतांनी जातीय-धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचेच नाव घेऊन समाजात असंतोष पसरविण्याचे कारस्थान काही लोक करीत आहेत. असा टोला संभाजी भिडेचे नाव न घेता लगावला. या कारस्थानापासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक हभप विकास लवांडे आणि हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांनी समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहावी, यासाठी भागवत वारकरी महासंघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त हभप दिनकर शास्त्री भुकेले यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली.