मतदार यादीवरील आक्षेपावर सुनावणी संपली
…तर नाममात्र सभासद राहिले असते
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा सध्या पूर्ण झाला असून, यातील मतदार यादीवरील आक्षेपावर सुनावणी संपली. त्याचा निकाल जाहीर केला, त्यामध्ये ज्या मतदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुढे आला होता. तो प्रादेशिक सहसंचालक व सह निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी निकाली काढला. छत्रपती कारखान्याचे 23031 सभासद हे निवडणूकीसाठी पात्र ठरले.
विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार 29 हजार 518 मतदारांपैकी सभासदांपैकी 21, 365 सभासद अपात्र ठरले असते व केवळ 8153 एवढेच सभासदांना मतदान करता आले असते, मात्र या प्रादेशिक सहसंचालकाच्या निर्णयामुळे सर्व सभासदांच्या अधिकार सुरक्षित राहिले आहेत. हे सभासद अपात्र झाले असते. तर अनेक गावांमध्ये नाममात्र सभासद राहिले असते, अशी आकडेवारी समोर आली आहे.
ही आकडेवारी लक्षात आल्यानंतर सभासदांना ही आश्चर्याचा धक्का बसला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत ज्या सभासदांना अपात्र करावे, असा आक्षेप विरोधक सभासदांनी घेतला होता. त्यामध्ये महत्त्वाच्या गावांमधील बहुसंख्य सभासद हे अपात्र ठरले असते, असे समोर आले आहे. त्यामुळे कारखान्या लगेचच्या अनेक सभासदांना याचा फटका बसला असता असे आकडेवारीवरून दिसते.