मुंबई: दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तबलिगीने मरकजचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील हजारो लोक सहभागी झाले होते. यातून काही लोकांनी कदाचित करोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे आजची परिस्थिती लक्षात घेता पथ्य पाळले नाही त्यामुळे याची किंमत मोजावी लागत आहे, अशी भीती व्यक्त करतानाच निजामुद्दीन घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.
शरद पवार यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देताना करोनाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. 8 एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानमध्ये एकत्रित जावून हयात नसलेल्या नातेवाईकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हे स्मरण घरात बसूनच करा. नमाजही घरातच बसून करा. ही वेळ किंवा प्रसंग एकत्रित बाहेर जाण्याचा नाही. त्यामुळे निजामुद्दीनमध्ये जे घडले ते घडू देवू नका याची खबरदारी घ्या, अशी सूचना पवार यांनी केली.
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण श्रध्देने करण्याचा दिवस आहे. देशभरातून लोक एकत्र येत असतात आणि हा सोहळा दीड महिना चालतो. यावेळेला हा सोहळा साजरा करायचा हा प्रसंग आहे का? हे गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सामुदायिक एकत्र आलो तर नवीन संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मरण करुया आणि त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून या सोहळ्यात बदल करण्याचा जाणकारांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारने व पोलीस, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करावे. मात्र त्याची अंमलबजावणी काहीजण करत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागते. त्यामुळे पोलिसांसोबत संघर्ष होतो आहे, हे योग्य नाही. ते टाळले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व पोलीस दलाचे लोक धोका पत्करुन अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचा सन्मान करा, असे सांगतानाच ओपीडी किंवा दवाखाने बंद करू नका, लोकांना सुविधा द्या, अशा सूचनाही शरद पवार यांनी दिल्या.
राज्य सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी रिलीफ केंद्रे उघडली आहेत.
1 एप्रिलपर्यंत राज्यात करोनातील लोकांना मदत योजना म्हणून 817 ठिकाणी केंद्रे उघडली आहेत त्यामध्ये 64 हजार 969 लोकांची भोजन व्यवस्था, याशिवाय लेबर कॅम्प – 1 हजार 721 ठिकाणी – 2 लाख 49 हजार 399 लोकांना सहभागी केले आहे. साखर कारखान्यात 28 कॅम्प असून त्यामध्ये 2 हजार 575 मजुर आहेत. याशिवाय पाटबंधारे व विविध विकासकामे यावर 577 कॅम्प उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये 15 हजार 323 मजूर काम करत आहेत. असे एकूण राज्यात 3 हजार 143 कॅम्पमध्ये 3 लाख 32 हजार 266 लोकांना निवारा, अन्नधान्य व औषध सुविधा देण्यात आली आहे, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.
वाचन संस्कृती वाढवण्याचा सल्ला
तरुणांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत अनेक पुस्तके वाचनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनदर्शन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तन लिखाण, विठ्ठलराव शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, या महान व्यक्तींचे जीवनदर्शन लिखाण वाचा. वैज्ञानिक दृष्टिकोन मजबूत होईल यावर आधारित लिखाण वाचन करा, आपला व्यक्तीगत ज्ञानसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, ज्ञानसंपादीत सुसंवाद ठेवा, सुट्टीच्या कालावधीचा आस्वाद घ्या आणि स्वतःचं व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा सल्लाही शरद पवार यांनी दिला.