पाटणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या नावावर केवळ लोकांना फसवण्याचेच काम केले अशी बोचरी टीका बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली. ते गोपालगंज विधानसभा क्षेत्रातील जादोपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. तेजस्वी म्हणाले पंतप्रधान त्यांच्या भाषणात मला शहजादा म्हणतात.
आता आम्ही पण त्यांना पीरजादा म्हणणार आहोत. पीरजादा म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या जनतेने मोदी यांना ४० पैकी ३९ जागा दिल्या. आपल्या प्रचारात पंतप्रधान साखर कारखाने, रोजगार आदी विषयांवर बोलायचे. मात्र आता त्यांनीच सांगावे की त्यांनी गेल्या दहा वर्षांत बिहारमध्ये काय काम केले.
कोणी विकासाबाबत प्रश्न विचारू नये म्हणून ते मंदिर आणि मशिद या विषयांवर बोलतात. बिहारमध्ये पंतप्रधानांनी कोणतेच काम केले नाही. मला १७ महिने बिहारमध्ये सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी आम्ही शिक्षण विभागासह अन्य विभागांत ४ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या.
आताही निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे सरकार आले तर १ कोटी लोकांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. हा राहुल गांधी यांचा निर्णय आहे. त्याशिवाय अग्निवीर योजना रद्द केली जाईल. या योजनेत पंतप्रधान युवकांना केवळ चार वर्षांसाठी काम देत आहेत.
मात्र ते स्वत: ७५ वर्षांचे असताना पुढील पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळावी म्हणून मते मागत आहेत. दरम्यान, यावेळी व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहानी म्हणाले की देशाचे संविधान वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर सभा घेत आहेत. मात्र सरकार बनवल्यावर काय करणार याची माहिती ते देत नाहीत.