रायगड – निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह रायगडला अक्षरशः झोडपून काढले आहे. यात काजू, फोफळी, आंबा आणि नारळाच्या बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
शरद पवार उद्या (9 जून) रायगड जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतील. त्यानंतर 10 जून रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही मंत्रीसुद्धा असतील.
दरम्यान, हा दौरा आटोपताच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कशाप्रकारे मदत करता येईल, यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईला परत येताच त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभं कसं करायचं? रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यांतील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरून काढायचं? तसेच कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.