पुणे (जिल्हा प्रतिनिधी)- निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी (दि. 3) जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे 13 तालुक्यांतील खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, पुरंदर, मुळशी, वेल्हे या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्याआगोरच हा तडाखा बसल्याने हंगामतील पिके वाचली असली तरी बळीराजाचे घर, गोठे आदीचे अतोनात नुकसान झाल्याने करोनानंतर आता “निसर्ग’ही बळीराजाच्या मुळावर उठला आहे, अशी खंत बळीराजाने व्यक्त केली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे वरील तालुक्यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तर खेड तालुक्यातील वहागाव येथे नवीन घराची भिंत कोसळून माय-लेकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2019-20च्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम जवळपास वाहून गेला होता. तर रब्बी हंगामाची पेरणी उशिरा झाल्याने काढणीही उशिरा होणार होती.मात्र, तोपर्यंत करोनामुळे संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला अन् शेतकऱ्याचा शेतमालही “लॉक’मध्ये अडकला त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतमाल केवळ लॉकडाऊनमुळे एकतर फेकून द्यावा लागला किंवा शेतातच सडताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यावर वेळ आली होती. यातून सावरत नाही तोच निसर्ग चक्रीवादळाचा फटका पुन्हा बसल्याने शेतकऱ्यांना यंदा सावरायला मिळणार आहे की नाही, असा प्रश्न बळीराजाच्या मानात निर्माण झाला आहे.
महावितरणचे कोट्यवधीचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकाठिकाणी विजेच्या तारा, खांब, रोहित्र कोसळल्याने महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, विविध नैसर्गिक अपत्तीमुळे शेतकऱ्यांसह महावितरणचे नुकसान होत असल्याचे आतापर्यंत झाले आहे.
गावरान हापूसचे मोठे नुकसान
जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यातील पश्चिम भागातील परिसरात मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. कोकण हापूसचा हंगाम संपल्यावर जिल्ह्यातील गावरान हापूसचा हंगाम सुरू होतो. मात्र, ऐन काढणीला आलेला हापूस वादळी पावसाने झडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील हापूस हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बरोबरच आखाती देशांमध्ये निर्यात होते. मात्र, यंदा तो “निसर्ग’च्या तडाख्यात सापडल्याने आंबा उत्पादक हताश झाला आहे.
फळभाजीपाला पिकांचे 100 टक्के नुकसान
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 13 ही तालुक्यांतील सर्व फळभाजीपाला पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. जनावरांचे गोठे, शेततळी, पत्रा छत असलेली घरे, व्यावसायिक दुकाने आदींचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले आंबा, डाळिंब, केळी, टोमॅटो, सीताफळ या फळभाजीपाला पिकांचे भरून न येणारे नुकसान झाले. कलमी फळांची झाडे उन्मळून पडली. द्राक्ष वेली तुटल्याने मागील वर्षभरात द्राक्ष उत्पादकांना दुसऱ्यांदा फटका बसला.
फळ, फूल शेती उद्ध्वस्त
निसर्ग चक्रीवादळामुळे उन्हाळी हंगामातील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर फुलासाठी खास केलेल्या पॉलीहाऊस जमीनदोस्त झाले आहेत. दरम्यान, फूल उत्पदकांसाठी लग्नसराई म्हणजे उत्सव असतो त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी जानेवारी ते जूनपर्यंत विविध फुले घेत असतात. यंदा तोडीलायक फुले झाली असतानाच लॉकडाऊनमुळे यंदा त्यांचा सुंगध शेतापुरताच मर्यादित राहिला होता. तर आता पुन्हा फूलशेतीला या निसर्ग चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे.