व्यवस्थापन हा आज परवलीचा शब्द बनला आहे. नाती, घर, सहकारी,आरोग्य, व्यवसाय इतकेच नव्हे तर वर्तमानात ताणतणावाचेही व्यवस्थापन केले जात असल्याचे नजरेस पडते. स्थितीत सहजता नसली किंवा विसंगती असली की व्यवस्थापन हा शब्द आलाच. कोणाशी जुळवून घ्यावे, कोणाला मोठेपणा द्यावा, कधी कुठं फारकत घ्यावी, कधी प्रशंसा करावी, तर कधी खरडपट्टी काढावी हे लिलया जमणाऱ्यासाठी व्यवस्थापन डाव्या हाताचा खेळ ठरतो. प्राप्त परिस्थितीत सभोवार असलेल्या लोकांना हाताशी घेत आपले इप्सित साध्य करण्याचे कसब हेच व्यवस्थापनाचे मूळ सूत्र. अशा संकल्पना परदेशाहून आल्या की आपल्याला त्याचं अप्रूप वाटते, पण भारतीय समाज व्यवस्थेत याची मुळे पूर्वीपासून आढळून येतात.
रावणासारखा वैरी, दूर अंतरावरची लंकानगरी, वाटेत विराट समुद्र, वाहनांची वानवा आणि त्यात परत वानराची सेना. जिंकण्यासाठी अभिप्रेत असलेले कोणतेही साधन नसून रामाने रावणावर विजय मिळवला. कारण एकच, श्रीरामाचे व्यवस्थापन. व्यवस्थापन किंवा नेतृत्व करणाऱ्याला किमान स्रोतापासून कमाल उत्पादन काढता आलं पाहिजे. कुरूक्षेत्रात श्रीकृष्णाने अर्जुनास दिलेला उपदेश अर्थात श्रीमद भगवद् गीता ही व्यवस्थापन क्षेत्राची गंगोत्रीच जणू. या उपदेशातून त्याने गलितगात्र अर्जुनात त्राण भरले. शिष्टाई हाही व्यवस्थापनाचा एक भाग. श्रीकृष्णाने कौरवांकडे पांडवांना राज्य परत करण्यासाठी शिष्टाई केली. पुरेशी लवचिकताही दाखवली, पण आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याने मग त्याने पांडवास युद्ध करण्यासही प्रवृत्त केले.
श्रीकृष्णाने केलेल्या व्यवस्थापनाच्या जोरावरच पांडवांना जय मिळाला, अन्यथा युद्ध जिंकणे त्यांच्या क्षमते बाहेरचेच होते.
व्यवस्थापन करणाऱ्याला आपल्या समजूतदारपणा बरोबरच इतरांना समजून घेण्याचे लकब अवगत असणे अनिवार्य असते. गुण ग्राहकताही त्याच्या ठायी असावी लागते. आपले पहिले पाऊल पुढे टाकल्यावर ते बरोबर पडल्याची खात्री करून मग आपले दुसरे पाऊल उचलणे हे चांगल्या व्यवस्थापकाचे लक्षण. नेतृत्व किंवा व्यवस्थापन करणाऱ्याला स्थितप्रज्ञ असणेही गरजेचे असते. बऱ्याचदा प्रश्न स्वतःला पडतो. अशा वेळी वाट पाहण्याचे संयमही आवश्यक असते. आपण कशात पडावं कशात नाही हे त्याला उमजणं आवश्यक असते.
विपरीत वृत्तीच्या लोकांबरोबर राहणे, त्यांना जोडून ठेवणे आणि निर्वाह करणे हे शिकायचे झाल्यास शंकराहून चांगला गुरू सापडणे कठीण आणि यासाठी त्यांचे कुटुंब एक निराळं उदाहरणे ठरू शकेल.शंकराच्या माथ्यावर शीतलता देणारा चंद्र पण ललाटावरील असलेल्या दाहक अशा तिसऱ्या डोळ्याशी असूया. त्याच्या गळ्यात रेंगाळणारा नाग हा तर धाकट्या गणपतीचे वाहन असलेल्या उंदिराचा कायमचा वैरी. त्याच वेळी त्या नागावर त्याचा पारंपरिक शत्रू असलेल्या मोराची अर्थात थोरल्या कार्तिकेयच्या वाहनाचीही वक्रदृष्टी. विनायकाचा चेहरा हत्तीचा असल्याने पार्वतीचे वाहन असलेल्या सिंहाचा त्याच्यावर सततचा डोळा. एव्हढे असून परत गळ्यात हलाहलचा कहर आणि स्मशानात निवास. इतक्या परस्परविरोधी व्यक्तींना किंबहुना एकमेकांचे शत्रू असलेल्यांना एकत्र बांधून ठेवणे आणि परत संतुलनही राखणे, अशा वेळी व्यवस्थापनाचा खरंच कस लागतो.
थोडक्यात काय तर व्यवस्थापन म्हणजे काम मार्गी लावणे, नेमकेपणाने संयोजन करणे, घडी नीट बसविणे, ही घडी कशी बसवावी हे समजून घ्यायला साधं उदाहरण म्हणजे आपल्याला रोज लागणारा रूमाल. रुमाल खिशात ठेवायचे असेल, तर रूमालाच्या चारी टोकं एकत्र आणावी लागतात, टोकांना जुळवून घ्यावे लागते. मगच त्याची नीट घडी बसते. असेच ज्याला टोकांना जोडणे जमते, जुळवून आणणे जमते त्याला नेतृत्व, व्यवस्थापन जमलेच समजा.
परिघ
सत्येंद्र राठी