त्याचा दरवर्षीचा हा नियम होता. तो याच अनाथाश्रमात यायचा. सगळ्या मुलांना नवे कपडे, मिठाई, खेळणी घेऊन… यंदाही तो आला. पण त्याची पावलं जड होती. त्याची लाडकी बायजाक्का आठच दिवसांपूर्वी देवाघरी गेली होती. आपण कितीही दुःखात असलो तरी सणाला दुसऱ्यांना आनंद द्यायचाच हा ही त्याचाच नियम.
तो नेहमीप्रमाणे कपडे, मिठाई, खेळणी आणि अनाथाश्रमासाठीची देणगी घेऊन आश्रमात पोचला. सगळी मुलं रांगेत बसली होती. तिथल्या ताई-दादांनी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की आज एक काका तुमच्यासाठी कपडे, मिठाई आणि खेळणी घेऊन येणार आहेत. त्यामुळं पोरं वाटच बघत होती. तो आला तशी मुलांच्या डोळ्यात उत्सुकता. मुलांमध्ये चुळबूळ…
एकेक मुलगा उठून त्याच्या जवळ यायचा. मुलाच्या हातात तो कपड्याचा जोड, एक मिठाईचा बॉक्स आणि एक खेळणं द्यायचा. तो गेला की दुसरा मुलगा. अशी पंधरा-सोळा मुलं गेली. त्याच्या पुढचा मुलगा आला त्याला त्याने कपडे, मिठाई आणि खेळणी दिली. तसा तो म्हणाला, “काका मला हे खेळणं नको, ते पाहिजे.’ त्याने हसून त्याच्याकडे बघितलं आणि खेळणं बदलून दिलं. त्याच्या गालगुच्चा घेतला. तो मुलगा ते खेळणं हातात घेऊन खुशीत निघून गेला.
दिवस सरला. संध्याकाळी तो आपल्या आलिशान बंगल्यात एकटाच. बायको दिवाळसणाला माहेरी गेली होती. उद्या त्यालाही सासरी बोलावलं होतं, पण बायजाक्काचा दहावा करून पुढच्या दिवशी तो जाणार होता. घरात दोन-तीन नोकर होते. तो गॅलरीत बसला होता. थोड्या अंतरावरून नदी वाहात होती. नदीच्या डोहात खडक होते. तिथं एकदोन बगळे माशांवर डोळा ठेवून उभे होते. त्याला एकदम काहीतरी आठवलं. तितक्यात मागून आवाज आला.
“साहेब, तुमची आवडती डार्क कॉफी आणलेय.’
दररोज संध्याकाळी साडेसहाला त्याला डार्क कॉफी लागायची. त्याच्या घरात बायको आणि सगळ्या नोकरांनाही हे माहीत होतं. त्यामुळे त्या वेळेला न सांगता त्याला कॉफी आणून दिली जायची. गॅलरीत बनवलेल्या कट्ट्यावर कॉफीचा मग आणि एका छोट्या प्लेटमध्ये शंकरपाळी, चकली, चिवडा ठेवून नोकर निघून गेला. आता तिथे कॉफी मगातून निघणारी गरम वाफ आणि तो असे दोनच सजीव उरले होते. कॉफी मगातून बाहेर पडणाऱ्या वाफा त्याला त्याच्या बालपणात घेऊन गेल्या.
“अरे समीर, कित्ती थकवशील मला, ये बाळा भाकर खाऊन घे…’ बायजाक्का छोट्या समीरच्या मागे मागे फिरत होत्या. त्याची शाळा, ते प्रशस्त अंगण, रंगीबेरंगी फुलांची बाग, आंबा, चिकू, पेरूची झाडं… या परिसरात तो सारखा फिरत राहायचा. त्याला ना तहान लागायची ना भूक, पण जेवणाची वेळ झाली की बायजाक्का त्याच्या मागं फिरायची. त्याच्या मागं लागून त्याला एक एक तुकडा भाकरी भाजी भरवायची. ती खाऊन होईपर्यंत दोघं चांगली दमलेली असायची. मग दोघं आंब्याच्या झाडाशी बांधलेल्या ऐसपैस पारावर बसायची आणि तिथं बसून बायजाक्का त्याला कधी दूधभात, कधी वरणभात भरवायची. हा रोजचा दिनक्रम.
एक दिवस समीरने खूपच त्रास दिला म्हणून बायजाक्का चिडली. चार-आठ दिवसांपूर्वी ती तिथंच पडली होती म्हणून पायाला फ्रॅक्चर झालं होतं. तर आठ दिवस समीर गुपचूप एका जागी बसून जेवत होता. पण नवव्या दिवशी त्याला काय हुक्की आली कोण जाणे… तो बायजाक्काला पळवू लागला. बायजाक्का हळूहळू त्याच्या मागं पळायलाही लागली. पण पळता पळता तिच्या पावलाखाली एक छोटा दगड आला आणि तिला जी काय कळ बसली… ती जागेवरच मटकन खाली बसली. कशीबशी तिथून उठून ती आंब्याच्या पारावर जाऊन बसली तर समीर अजूनही पळापळीच्या मूडमध्येच होता. तिने बोलावलं तसं तो तिच्या थोडं जवळ आला आणि लगेच परत फिरला. त्याचा हात धरता धरता बायजाक्काच्या पायाला पुन्हा हिसका बसला मग मात्र तिने जवळच पडलेल्या काठीने त्याला दोन रट्टे लगावले. तोवर सगळी माणसं गोळा झाली होती. त्यांनी दोघांनाही समजावलं. बायजाक्कानंही समीरला जवळ घेतलं. त्याचे पापे घेतले. उगाच मारलं हो माझ्या बाळाला, लागलं का रे तुला असं म्हणताना त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी हाताने नेऊन त्याला जोजवलं, झोपवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच गलका उडाला. समीर नाहीये. बाकी सगळ्या मुलांच्या खोल्यांमध्ये बघितलं पण समीर कुठेच नव्हता. आठ वाजत आले होते. समीर नक्कीच रागात कुठेतरी निघून गेलाय हे लक्षात आलं. तीन चार माणसं गाड्या घेऊन बाहेर पडली. कुणी पूर्वेच्या दिशेला रामवाडीच्या रस्त्याने शोधत निघालं. कुणी दक्षिणेला मारुतीच्या मंदिराच्या दिशेने गेलं तर कुणी कुठे…
शेवटी एका माणसाला हायवेच्या पुलाखाली पाय दुमडून बसलेला समीर दिसला. तसा त्याने एक-दोघांना फोन केला. तो समीरच्या जवळ गेला. समीर पटकन उठून पळणार तितक्यात त्याने त्याला पकडलं. म्हणाला, “समीर चल, तुला कोणी काही बोलणार नाही, कुणीही तुझ्यावर रागावलेलं नाही. बायजाक्का तर रडून रडून बेजार झाली असेल आतापर्यंत.’ “जा, मला नाही यायचं, ती मला काठीने मारते. मला नाही आवडत ती. मला तिच्यापासून दूर जायचंय.’
अखेर कसंबसं त्याला समजावून परत आणलं. पण समीर काही ऐकत नव्हता. दोन दिवस तो बायजाक्काला टाळत होता. बायजाक्काचा जीव तुटत होता पण काय करावं तिला कळत नव्हतं. दोन दिवसांनी त्याचा राग शांत झाला. बायजाक्काने ठरवलंच होतं की आज काहीही झालं तरी समीरला भरवायचंच. ती दुपारच्या वेळेला ताट वाढून त्याच्या जवळ गेली. तो पारावर गुडघ्यात मान घालून बसला होता.
तिने ताट एका बाजूला ठेवलं आणि त्याची हनुवटी हाताने वर करत म्हणाली, “अजून राग नाही गेला का बाळा. माझा पाय दुखत होता म्हणून मी रागावले रे तुझ्यावर. मलाच कसंतरी झालं तुला मारलं तेव्हा. इथून पुढं मी कधीच नाही मारणार तुला.’
समीरने फक्त एकदा डोळे वर करून तिच्याकडे बघितलं आणि परत मान गुडघ्यात खूपसून बसून राहिला. बायजाक्काने हळूच ताट उचललं नि म्हणाली, “बाळा भाकर खाऊन घे. मी ही नाही जेवले दोन दिवस. असं आपल्या आईला कुणी उपाशी ठेवतं का सांग मला…’
आई हा शब्द ऐकून समीरचा राग पळाला. त्याने मान वर करून तोंडाचा आ केला आणि बायजाक्काने त्याच्या तोंडात भाकरी भाजीचा घास भरवला.
इकडे कॉफी थंड झाली होती तरी किंचित वाफा निघत होत्या. त्याने नोकराला बोलावलं नाही की कॉफी गरम करायला सांगितली नाही.
बायजाक्काने त्याला एकदा सांगितलं होतं. तिचे पती एका अपघातात वारले तेव्हापासून ती इथे आली आणि इथेच काम करत होती. पण समीरमध्ये तिला तिचं मूल दिसायचं म्हणून इतक्या सगळ्या पोरांमध्ये तिचा समीरवर खास जीव होता. त्याला जरा काही झालं की ती धावतपळत यायची. सगळी मुलं तिला बायजाक्का म्हणायची आणि सगळ्या मुलांना ती बाळ म्हणायची. सगळ्यांचीच ती आई होती. पण तरी समीरबद्दल तिला जास्त आस्था, जिव्हाळा होता.
त्या रुसव्याच्या घटनेपासून तर दोघांमधला जिव्हाळा प्रचंड वाढला.
समीर तिथून निघाला त्यालाही आता तीन वर्ष झाली होती. त्याची नोकरी, त्याचं लग्न… प्रत्येक महत्त्वाच्या घटनेच्या वेळी बायजाक्का त्याच्या सोबत होती. तीच त्याची आई आणि तीच त्याच्यासाठी बाबाही होते. कधी काही खुपलं, दुखलं, हरवलं, मन हरलं तर हक्कानं रडावं अशी ती मायेची कूस होती.
सकाळी दहाव्याचा विधी आटोपला. समीर सकाळपासून सगळा विधी व्यवस्थित पार पाडला. सगळ्यात शेवटी तो बायजाक्काच्या हार घातलेल्या तसबिरीसमोर गेला. आधीच्या लोकांनी वाहिलेल्या फुलांचा सुगंध तिथं दरवळत होता. त्याने तसबिरीकडे पाहिलं. दोन फुलं वाहिली. हात जोडून डोळे बंद केले. अचानक वाऱ्याची एक झुळूक आली आणि वरच्या आंब्याची पानं सळसळली. क्षणभर अनाथाश्रमातल्या बागेत आंब्याच्या पारावरच बसल्याचा भास त्याला झाला.
त्याने डोळे उघडले… समोर बायजाक्का होती. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या हातात त्याला भरवण्यासाठी घेतलेला घास होता. त्याच्या कानात बायजाक्काचे शब्द घुमले… “बाळा भाकर खाऊन घे…’
– बी. भालचंद्र