ठोस पावले उचलणे गरजेचे
कृष्णानगर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारालगतच्या सेवा रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. यामध्ये जीवितहानी होत असून, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते अजंठा चौक या दरम्यानच्या सेवा रस्त्यावर काल (दि. 1) रोजी झालेल्या रिक्षा व ट्रक अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. घटनास्थळी रस्त्यावर अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या सेवा रस्त्यावर एका बाजूला रिक्षा स्टॉप असून, दुसर्या बाजूला खाजगी प्रवासी वाहने उभी असतात. अनेक प्रवासी धोकादायकरित्या हमरस्त्यावर उभे असल्याचे चित्र आहे.
या ठिकाणी महामार्गावर तीव्र उतार असून, वाहने साताराकडे प्रचंड वेगाने वळण घेतात. गतवर्षी सेवा रस्त्यावर ट्रक उलटून पादचारी ठार झाला होता. वाहनांना महामार्गावरून सेवा रस्त्यावर येण्यासाठी लागणारी जागा खूप मोठी आहे. या उतारावर वेगमर्यादा, रम्बलर स्ट्रिप्स किंवा सातारा शहराकडे वळण दाखवणारा फलक यांचा अभाव आहे.
या रस्त्यावर गेल्या वर्षी 26 ऑगस्टला खाजगी प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या पिकअप वाहनाला तवेरा धडकून दोन जण ठार झाले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकारी वर्गाला सूचना केल्या होत्या. त्यामध्ये सेवा रस्त्याला संरक्षक कठडे (रेलिंग) बसवणे, नो-पार्किंग व वेगमर्यादेचे फलक उभारणे या सूचनांचा समावेश होता. त्याचबरोबर खाजगी प्रवासी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन, आदर्श नियमावली तयार करण्याचा आदेश दिला होता; परंतु या सूचना हवेतच विरल्याने काल (दि. 1) अपघातात आणखी एक बळी गेला. या सेवा रस्त्यावर अनेक वाहनांच्या शोरूम्स आहेत. त्याबाहेर रस्त्यावर अवैधरित्या दुचाकी पार्किंग करण्यात येते. याच रस्त्यावर अनेक ट्रान्सपोर्ट ऑफिसेस आणि पंक्चर काढण्याची दुकाने असल्याने, अवजड वाहने बेशिस्तपणे पार्किंग केलेली असतात. मंत्र्यांच्या दौर्यांवेळी हे रस्ते मोकळे केले जातात. मात्र, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.
सातारा पोलिसांची वाहतूक शाखा फक्त दुचाकीस्वारांवर कारवाया करून, दंड वसूल करताना दिसून येतात; परंतु अवैध पार्किंग, अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होत नाही. हे कोणाच्या कृपाशिर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. या रस्त्यावर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नेमावेत, अशी मागणी जोर धरत आहे.