पळसदेव –इंदापूर तालुक्यात बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यात मान्सून देखील काही दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी पेरणीच्या तयारीस लागला आहे; मात्र शेतकर्यांनी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत असल्यास बियाणाची उगवणक्षमता तपासूनच बियाणाची पेरणी करावी असे आवाहन मंडल कृषी अधिकारी किरण पिसाळ यांनी केले आहे.
पळसदेव (ता. इंदापूर) येथील माळेवाडी भागात संत सावतामाळी मंदिरात कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना किरण पिसाळ बोलत होते. शेतकर्यांनी बियाणं प्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकदल बियाणांसाठी अझोटोबँकतर व द्विदल पिकासाठी रायझोबियम चा वापर करावा. बियाणाची उगवण क्षमता अगदी घरगुती पद्धतीने तपासणी करून पेरणी केल्यास शेतकर्याचे आर्थिक नुकसान टाळता येईल.
शेतकर्यांनी बियाणे खरेदी केल्यावर त्याची पावती घ्यावी. व बी बियाणाची पेरणी करताना प्रत्येक बॅगमधील काही बियाणे शिल्लक ठेवावे. बॅग फोडताना शक्यतो तळातून कापावी त्यामुळे बियाणाच्या बॅग वरील नंबर कायम राहतात यामुळे जर बियाणे उगवले नाही तर संबंधित कंपनीवर कारवाही करता येते त्यासाठी शेतकर्यांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन पिसाळ यांनी या वेळी केले. या वेळी कृषी पर्यवेक्षक जी. डी. खंडागळे, कृषी सहायक गणपत खांडेकर सह शेतकरी बबन बनसुडे, कांतीलाल बनसुडे, प्रमोद शेलार, दत्तात्रय बनसुडे, अप्पा घाडगे, महेश बनसुडे, स्वप्नील फुले यांसह शेतकरी उपिस्थत होते.
अशी तपासावी उगवण क्षमता तपासणी
सुरुवातीला पेरणी करणार्या बियाणातील शंभर बियाणे घेऊन एक गोणपाट ओले करून घ्यायचे. त्यामध्ये दहा ओळी करून हे शंभर बियाणाची मांडणी करावी व ते गोणपाट ओलसर राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी शंभर बियाणांपैकी किती उगवले हे तपासावे. यातील समजा सत्तर बियाणे उगवले तर बियाणाची क्षमता सत्तर टक्के असे असे समजून पेरणी करताना अधिकचे बियाणे पेरणी करावी. यामध्ये उगवण क्षमता तपासणी केल्यामुळे शेतकर्याचा संभाव्य नुकसान टाळता येते.