नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दरम्यान, रॉय यांनी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढेच नाही तर मुकुल रॉय दोन दिवसापूर्वी दिल्लीलाही गेले होते. या राजकीय घडामोडीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे.
ममता बॅनर्जी यांनी ‘मुकुल रॉय हे भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा, हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण त्यांचा मुलगा सुभ्रांशु याने मुकुल रॉय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे,”अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. “मी कधीही टीएमसीबरोबर नव्हतो. मी भाजपाबरोबर काम करत राहीन, असे मुकुल रॉय म्हणाले होते.
मुकुल रॉय प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा सत्तेत आहे, त्यामुळे त्यांना वाट्टेल ते, ते करत आहेत.. पण सत्ता ही तात्पुरती असते हे त्यांना समजत नाही. खुर्ची येते आणि जाते, पण लोकशाही कायम राहील. संविधान कायम राहील, त्यात काही दुरुस्त्या होऊ शकतात, पण या संविधानावर बुलडोझर चालवता येणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत भाजपा जिंकणार नाही.
मुकुल रॉय हे सोमवारी रात्री दिल्लीत गेले. वैयक्तिक कामामुळे आपण दिल्लीला गेलो, असं त्यांनी म्हटलं. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं होतं. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आजारी असलेल्या टीएमसी नेत्याचा वापर करून भाजपाने गलिच्छ राजकारण करू नये.” दुसरीकडे, मंगळवारी मुकुल रॉय यांनी एका बंगाली वृत्तवाहिनीला सांगितलं की, मी भाजपाचा आमदार आहे. मला भाजपाबरोबर राहायचं आहे. मला अमित शाहांना भेटायचं आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बोलायचे आहे, असे म्हटले आहे.