नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात गोंधळ उडाला आहे. कारण आता २४ तासातच तृणमूलला दुसरा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याचा धक्का बसल्यानंतर आता तृणमूलच्या आणखी पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामे करता येत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचे या नेत्यांनी सांगितले. “राजीनामे महत्त्वाचे नसून, प्रत्येक विभागात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बामोणगोला विभागातही पाच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत,” असं तृणमूल काँग्रेसचे मालदाचे जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे. १९ डिसेंबरला अधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत असून हा तृणमूलला मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वी पक्षावर नाराज असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने तृणमूलला मोठा धक्का बसला आहे. अधिकारी लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे तृणमूलने भाजपावर नेत्यांना फोडत असल्याचा आरोप करत निशाणा साधला आहे.