मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे आमदार फोडणार असल्याची भाषा करताना दिसत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असे भाकित केले होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना पुन्हा एकदा एक आव्हान दिले आहे.
भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले आहे.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”, असे थेट आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले.
“भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असे काही लोकं सांगतात. २० तर सोडाच, पण १२ महिन्याचे १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे”, असेही मुनगंटीवार म्हणाले.