पुणे – शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येत आहेत. त्यामुळे पाणीगळती सापडत आहे. त्यात अवघ्या 4 ठिकाणची गळती बंद केल्याने महापालिकेस दररोज तब्बल 1 कोटी 10 लाख लिटर पाणी वाचविण्यात यश आले आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
आयुक्त म्हणाले, शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुमारे 40 ते 45 वर्षे जुनी आहे. त्यामुळे जुन्या वाहिन्यांतून पाणी गळती वाढली होती. ती रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेत मुख्य टाकी, मुख्य वाहिनी आणि उपवाहिन्या आदी ठिकाणी पाणीमीटर बसवून गळती शोधली जात आहे. प्रत्यक्षात सोडण्यात आलेले पाणी किती, ते ठराविक ठिकाणी किती पोहचले हे पाण्यासाठी शहरात जवळपास 242 ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे या मीटरमुळे नेमके किती पाणी कुठे पोहचते, तसेच मोठी गळती कशी होते हे निदर्शनास आले आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या नळजोडाला पाण्याचे मीटर बसविण्यात येत आहे. हे काम वेगाने झाले नसले, तरी पुढील काळात पाण्याचे मीटर बसविण्यावर भर दिला जाणार आहे.
या ठिकाणी सापडली गळती
वडगाव केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर अशुद्ध राहणारे पाणी वेगळ्या यंत्रणेद्वारे शुद्ध केले जाते. त्यासाठी तेथे 4 एमएलडी क्षमतेचा लहान प्रकल्पही आहे. मात्र, तो बंदच असल्याने त्यातले पाणी नाल्यात सोडले जात होते. मात्र, तो पुन्हा सुरू करण्यात आला. त्यामुळे रोज 40 लाख लिटर पाणी पुन्हा वापरात आले आहे. येथील रॉ वॉटर पंपिग स्टेशनच्या एका मुख्य जलवाहिनीला गळती होती. तेथील पाणी थेट पावसाळी गटारात जात होते. हे पाणी दिवसाला तब्बल 75 लाख लिटर होते. ही गळतीही पालिकेने बंद केली आहे. याशिवाय केदारेश्वर पाण्याची टाकी तसेच राजस सोसायटी चौकातही एक गळती सापडली आहे. येथे दिवसाला 5 लाख लिटर पाणी वाय जात होते. तेदेखील बंद करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.