नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्याआरोपानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असताना दुसरीकडे भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, या सर्वात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केले आहे. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असा आरोप करणारे एक ट्विट तुषार गांधी यांनी केले आहे.
Savarkar not only helped the British, he also helped Nathuram Godse find an efficient gun to murder Bapu. Till two days before Bapu’s Murder, Godse did not have a reliable weapon to carry out the murder of M. K. Gandhi.
— Tushar (@TusharG) November 19, 2022
दरम्यान तुषार गांधी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मी आरोप करत नाही आहे. मी जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितलं आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार २६,२७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले.
ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही,” असे तुषार गांधी म्हणाले आहेत.
दरम्यान, तुषार गांधी यांनी केलेल्या या दाव्यावर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.