सातारा – सातारकरांनो, तुम्हाला शहरात प्रवास करायचा आहे तर खड्ड्यात जाण्याची तयारी ठेवा. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करायचे सोडून सातारा पालिकेने पुन्हा वीस लाख रुपये पॅचिंगच्या निमित्ताने खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने पालिका प्रशासनाच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. आमच्या नशिबातील खड्ड्यांचा वनवास कधी संपणार, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे.
साताऱ्यात वर्दळीच्या प्रमुख तीन रस्त्यांसह इतर तेरा रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाल्याने सातारकरांचा प्रवास जीव मुठीत घेऊन सुरू आहे. राजपथ, कर्मवीर पथ व राधिका रोडवर पुन्हा पॅचवर्क करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या असून हा मुलामा किती दिवस टिकणार, हा सातारकरांचा प्रश्न आहे. ऐन पावसाळ्यात सातारा पालिकेने धावाधाव करून शहरात प्रमुख रस्त्यांचे 11 लाख रुपयांचे पॅचवर्क केले होते.
मात्र, पावसाचा जोर 27 जुलैनंतर वाढल्यानंतर हे काम थांबवण्यात आले. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत सकाळी मुरूमाच्या रस्त्यावरून धुळीतून प्रवास आणि संध्याकाळी प्रचंड पाऊस, अशा दुहेरी तडाख्याने सातारकरांच्या सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आता पावसाचा जोर कमी झाला तरी शहरातील सर्व मुरुम वाहून गेल्याने रस्त्यावरची खडी उघडी पडली आहे. त्यामुळे सातारकरांचा पुन्हा खड्ड्यांमधून प्रवास सुरू झाला आहे.
राधिका रोडवर प्रचंड दलदल
शहराच्या पूर्वेकडून राजवाड्यावर येण्यासाठी राधिका रोड हा महत्त्वाचा पर्याय आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर रस्त्यावर खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यांमुळे दलदल निर्माण झाली आहे. याच परिसरात प्राधिकरणाच्या वाहिनीला गळती लागून पाणी रस्त्यावर वाहत असते. हॉटेल राजतारा ते कर्मवीर कॉलनी हा रस्ता प्रचंड उखडला असून प्रवास धोकादायक झाला आहे.
साताऱ्यातील प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास कोटी रुपयांची घोषणा ऐन निवडणुकीत केली होती. त्यावेळी राजकीय हेतूने झालेली ही घोषणा प्रत्यक्षात कधी येणार, या पश्नाला सध्या उत्तर नाही. या निधीसाठी शिवेंद्रराजे यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे. सातारा पालिकेला या पन्नास कोटींच्या निधीची प्रतीक्षा आहे, कारण महसूल आटला असून पालिकेचे बजेटही जिल्हाधिकारी कार्यालयात अडकून पडले आहे. परिणामी खड्डेविरहित रस्ते, हे सातारकरांसाठी दिवास्वानच ठरणार आहे.
पारंगे चौकातील रस्ता शोधा
नेताजी सुभाषचंद्र चौक ते जुना आरटीओ चौक या दरम्यानचा रस्ता तर खड्ड्यातून शोधण्याची वेळ आली आहे. मोठी खडी रस्त्यावर इतस्तत: पसरली असून वाहने घसरून अपघातांचा धोका संभवतो. ऑक्टोबर महिन्यात याच चौकात खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने छोटा टेम्पो अडकून उलटला होता. अजूनही तो खड्डा तसाच असून येथे तातडीचे पॅचवर्क करणे आवश्यक आहे.
पालिकेकडे अपुरा निधी?
उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघाच्या विकासाचे कारण देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे; पण सातारकरांना दूरपर्यंत विकास दिसेनासा झाला आहे. शिवेंद्रराजे यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा आहे.
सातारा पालिकेवर वर्चस्व असणाऱ्या उदयनराजे यांचे भाजपकडून कदाचित सन्मानाने पुनर्वसन होईल; पण सातारकरांचा वनवास कधी संपणार, हा प्रश्न आहे. नागरिकांना अजूनही पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतरही शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण हातात घेण्याऐवजी सातारकरांचे वीस लाख रुपये खड्ड्यात घालवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करणासाठी पालिकेकडे निधीच शिल्लक नसल्याची माहिती आहे.
राजपथालाही खड्ड्यांचे ठिगळ
राजपथ हा साताऱ्यातील वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. राजपथालाही शाही मशीद परिसरात प्रचंड खड्डे पडले आहेत. देवी चौकात पाण्याची गळती काढण्यासाठी चर काढण्यात आले होते. ते चर व्यवस्थित न बुजवल्याने रस्त्यांची लेव्हल बिघडली आहे.