30 जेसीबीद्वारे गुलालाची उधळण करत जामखेड शहरात मिरवणूक
जामखेड – कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आसलेले कुकडीचे पाणी व औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत बैठक झाली असून दोन्ही तालुक्याच्या शेतीसाठी कुकडीचे पाणी मतदारसंघात आणण्यासाठीचा गेल्या आठ दिवसापूर्वीच सर्व्हे सुरू केला आहे. आगामी पाच वर्षात विकास म्हणजे काय असतो हे दाखवून देणार असल्याचे असे मत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
कर्जत जामखेड मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाल्यानंतर प्रथमच आमदार रोहित पवार मतदाराचे आभार मानण्यासाठी जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान रोहित पवार यांची 30 जेसीबीव्दारे गुलालाची उधळण करत जामखेड शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या विजयी सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी,तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, नगरसेवक पवन राळेभात, दिंगबर चव्हाण, अमित जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, दादासाहेब सरनोबत, सनी सदाफुले, विकी सदाफुले, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, अमृत महाराज डूचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुपारी एक वाजता जामखेड शहरात आमदार रोहित पवार आल्यानंतर जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.
यानंतर आ. रोहित पवार यांच्या नगर रोडवरील संपर्क कार्यालयापासून बीड रोडवरील मार्केट यार्डपर्यंत एक किलोमीटर इतकी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान ठिकठिकाणी स्वागतासाठी रस्त्याच्या बाजूला जेसीबी मशिन उभे करुन त्यावर उभे राहून कार्यकर्ते गुलालाची व फुलांची उधळण करुन फटाक्यांची आतिषबाजी करत होते. या विजयाच्या आनंदोत्सवात कार्यकर्ते रंगुन गेले होते. यावेळी मिरवणूकीत शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, मतदारसंघात माझ्यावर लोकांचे प्रेम होते, त्यामुळेच माझा विजय झाला.मात्र हा विजय माझा नसुन लोकांचा आहे. प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा देखील प्रश्न देखील मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. लोकांची शासकीय कार्यालयात पिळवणूक थांबवण्यासाठी शहरात कॉलसेंटर उघडणार असुन नागरीकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी संपर्क कार्यालय देखील होणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
शहरात नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची मोठ्या उत्साहात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आ. रोहित पवार यांनी मिरवणूक संपताच साकत येथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.