सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “माझी माती- माझा देश’ संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले आहे, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत “मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत सोमवारी जिल्हा परिषद ते शिवतीर्थ पोवई नाका अशी अमृत कलश यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी श्री. देसाई बोलत होते.यावेळी अमृत कलशाचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.कलशाचे पूजन करुन ते स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले.
शंभूराज देसाई म्हणाले, “”हुतात्म्यांना, वीरांना, जवानांना अभिवादन करून देशपातळीवरील एक अतिउच्च स्मारक दिल्लीमध्ये तयार होत आहे. त्याठिकाणी आपल्या प्रत्येक गावातील, देशभरातील माती समर्पित करणार आहोत. प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेला हा एक स्तुत्य उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने हा उपक्रम राज्यभर साजरा केला. आज हा जिल्ह्याचा कलश मुंबई येथे जाईल व तेथून तो नवी दिल्लीला जाईल.”जिल्हा परिषदते आज सकाळी 7.30 वाजता 11 तालुका पंचायत समितीमधून अमृत कलश आणण्यात आले. तेथून ढोल ताशांच्या गजरात कलशाची मिरवणूक पोवई नाक्यापर्यंत काढण्यात आली. विविध विभागाच्या योजनांचे चित्ररथही यावेळी सहभागी झाले.
पारंपारिक माणदेशी गजी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत राष्ट्रीय पारंपरिक पोषाखात अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. गटविकास अधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडे अमृत कलश सपुर्द केल्यानंतर शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कलशांमध्ये तालुक्यांमधील प्रत्येक गावांमधील माती आणि तांदूळ जमा करण्यात आले आहेत. उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली. “अफजलखानाचा वध’ हा पोवाडा सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप करण्यात आला.