सातारा – नाट्यशास्त्राचा जसजसा अभ्यास करत गेलो, तसं तसे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात जागतिक नाट्यशास्त्रांचे दर्शन होते गेले. जागतिक पातळीवर नाट्यशास्त्राचा जो विचार महान नाट्यचिंतकांनी केला आहे तो किती सारखा आहे हे लक्षात आले. स्तानेस्लावस्की,अं तोन, ब्रोटस्की, ब्रेख्त,पीटर ब्रुक या सगळ्यांनी नाट्य विषयक केलेला विचार आणि अडीच हजार वर्षांपूर्वी भरतमुनी यांनी नाट्यशास्त्राचा केलेला विचार यात फरक नाही, हे समजते. ही सगळीच मंडळी महान ऋषीमुनीच होत ,असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी व्यक्त केले.
साहित्य कला वर्तक (साकव) मंचाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुषार भद्रे बोलत होते. याप्रसंगी दीपलक्ष्मी सभागृहात नाट्य, चित्रकला, संगीत ,साहित्य या क्षेत्रातील साताऱ्यातील जाणकार मंडळी उपस्थित होती. दर महिन्याला एक कला, साहित्य विषयक उपक्रम या संस्थेच्या वतीने होणार असल्याचे साकवचे मधुसूदन पतकी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ज्येष्ठ चित्रकार बाळासाहेब कचरे, मनोज सिदमुल यांचा सत्कार भद्रे यांनी केला. तर भद्रे यांचा सत्कार ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके यांनी केला.
तुषार भद्रे पुढे म्हणाले, जागतिक पातळीवर मेथड अक्टिंग हा प्रवाह सुरू झाला होता. स्तानेस्लावस्की यांच्या या मेथड नाट्य प्रशिक्षणात आम्ही अभिनय शिकत असतानाच भरतमुनी यांनीही याच प्रकाराचे अत्यंत सखोल असे विश्लेषण केल्याचे समजून आले. मेथड अक्टिंग मध्ये जाणीवनिर्मिवाच्या आंतरप्रवाहात रममाण होऊन त्याचा अनुभव घेऊन नटाने अभिनय करणे अपेक्षित असते. तर भरतमुनी यांच्या सात्विक अभिनयात नेमके तेच सांगतात.
भरतमुनी याला परकाया प्रवेश म्हणतात, तर नटाने सत्व शोधण्यासाठी आत्मिक स्वच्छता,आत्म्याची निर्वस्त्रता विचारात घेऊन तन मनाने भूमिका वठवली पाहिजे असे स्तानेस्लावस्की यांनी सांगितले. भरतमुनी यांच्या ध्वनी, नाट्य, अभिनय, रस, रंग, मुद्राभिनय, वाचिक अभिनय, स्वरसाधना या सगळ्यांचे दाखले यावेळी भद्रे यांनी यावेळी दिले.
भद्रे पुढे म्हणाले, नाटक हे प्रेक्षक शरण आहे. प्रेक्षकाशिवाय नाटक होऊ शकत नाही. पीटर ब्रुक यांच्या म्हणण्यानुसार, रंगमंचावर एक किंवा दोन व्यक्ती व रंगमंचासमोर एक व्यक्ती असेल तरीही नाटक घडत असते .मात्र ते प्रेक्षक शरणच असते. चित्रकला, मूर्ती कला या कला व्यक्ती केंद्रित असतात. त्यांचा आशय सामाजिक व कलाकारी सामूहिक असू शकते. मात्र नाटक हे पूर्णपणे प्रेक्षक शरणच असते. लोकांनी, लोकांसाठी, लोकरंजनासाठी लोकांनीच म्हणून घडवलेला तो अविष्कार असतो. ब्रह्मदेवाने चार वर्ण एकत्र बसून मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी शिवशंकराला हे शास्त्र करण्यास सांगितले.
शिवशंकराने ऋग्वेदातून संवाद, सामवेदातून संगीत, आयुर्वेदातून रस परिपोष आणि अथर्ववेदातून अभिनय घेऊन नाट्यशास्त्र हे पाचवा वेद निर्माण केला. सहाजिकच संवाद, संगीत, अभिनय आणि रसपरिपोष याचा सविस्तर अभ्यास आपल्याला नाट्यशास्त्रात पाहायला मिळतो. नाटक शिकण्यासाठी चित्र, नृत्य, संगीत, शिल्प, वाद्य कलेचा अभ्यास महत्वाचा आहे हे स्पष्ट केले.