आरोग्य विभागाकडून १९ जिल्ह्यांमध्ये कॅच अप मोहीम सुरू
पुणे – राज्यसरकारने बालकांच्या लसीकरणासाठी खास कॅच अप ही मोहीम सुरू केली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना या मोहिमेत लस दिली जाणार आहे. पुणे, मुंबईसह १९ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत एमएमआर-१ आणि एमएमआर-२ पासून वंचित राहिलेल्या बालकांना नवीन वर्षांत राहिलेले डाेस दिले जाणार आहेत.
एमएमआर लसीकरण मुलांसाठी आवश्यक असते. या लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांमध्ये गोवरचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. या आधीच अशा बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारतर्फे या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार, डिसेंबरपर्यंत एमएमआर-१ लसीकरणाचे ४० टक्के आणि एमएमआर-२ लसीचे ५८ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
लसीकरणापासून वंचित राहण्याची प्रमुख कारणे हे स्थलांतरित मजूर, कामगार यांची मुले आहेत, तसेच काही समुदायात लसीकरणाला असलेला विरोध, मध्यंतरी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामुळेही लसीकरणाला फटका बसला. आता ते उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिन्यात कॅच अप मोहिमेचा पुढील टप्पा राबवला जाणार असल्याची माहिती आराेग्य विभागाचे सहायक आरोग्य संचालक डॉ. प्रवीण वेदपाठक यांनी दिली.
प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, वर्धा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही माेहीम राबवण्यात येणार आहे. करोना काळात लसीकरणावर परिणाम झाला होता. काही मुलांचा पहिला डोस झाला होता. मात्र, दुसरा डोस शिल्लक होता. काही मुलांचे एमएमआर लस घेण्याचे वय उलटून गेले. अशा सर्व मुलांपर्यंत पोहोचून लसीकरण करण्यात येणार असल्याचेही डाॅ. वेदपाठक यांनी सांगितले.
कॅच अप मोहिम
जिल्हे – १९
पहिला डोस उद्दिष्ट – ११,२२२
उद्दिष्ट पूर्ण – ४,५२५
टक्केवारी – ४० टक्के
दुसरा डोस उद्दिष्ट – ६,८४७
उद्दिष्ट पूर्ण – ३,९७१
टक्केवारी – ५८ टक्के