सातारा – दिव्यांचा उत्सव असणारी दीपावली अवघ्या 24 तासावर येऊन ठेपल्याने तिच्या स्वागतासाठी सातारकरांची खरेदीसाठी शहरातील रस्त्यावर प्रचंड गर्दी उसळली आहे. मोती चौक ते देवी चौक देवी चौक ते शाहू चौक यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत असून सातारकरांना वारंवार वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे शहर वाहतूक पोलिसांना गर्दी आवरताना नाकीनऊ येत असून पार्किंगचा सुद्धा ताण वाढला आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी सातारकर बाहेर पडले असून राजवाडा गोलबाग परिसर,खण आळी, पंचमुखी मंदिर तसेच देवी चौक ते मोती चौक या दरम्यानची सर्व सराफ बाजार, खरेदीची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत आहेत. मोती चौकात गर्दीचे नियमन करण्यासाठी तब्बल दहा वाहतूक पोलीस तैनात असून पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरामध्ये पाच वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. तरीसुद्धा पोवई नाका ते राजवाडा या दरम्यान होणाऱ्या वाहतुकीमुळे राजपथावर गर्दीचा तसेच वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत असून कमानी हौद ते देवी चौक यादरम्यान सर्विस रोड वरून वाहतूक वळवावी लागत आहे.
मोती चौकात बॅरिगेट लावून तेथील वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. मोती चौकातून वळता येत नसल्याने पुढे जाऊन वाहन चालकाला पुन्हा माघारी यावे लागत आहे. सध्या दिवाळी खरेदीमुळे पार्किंगचे नियम तात्पुरते शिथिल करण्यात आले आहेत. तरीसुद्धा खरेदी ही दुचाकीवरून असल्याने दुचाकी लावण्यासाठी सातारा शहरातील रस्त्यावरची जागा कमी पडत आहे. सातारा पालिकेकडून वाहतूक नियमाचे कोणतेही नियमन होत नसल्यामुळे तसेच सिग्नल यंत्रणा ही बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी सातारकरांना मनस्ताप देणारे ठरले आहे.
कोंडीमुळे चालत जाण्याची वेळ
शुक्रवारी तर शहरातील मुख्य बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत होत्या. शेवटी अनेक सातारकरांनी अक्षरशः शाहू चौकात गाड्या पार्क करून तेथून पायी खरेदीसाठी चालत जाणे पसंत केले वाहतूक विभागाने मात्र गर्दी नियंत्रणात ठेवणे संशयितांवर लक्ष ठेवणे तसेच कागदपत्रे नसणाऱ्या वाहनांची तपासणी करणे इत्यादी मोहीम हाती घेतल्या आहेत. तरीसुद्धा दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची गर्दी आवरणे कठीण जात आहे.
नागरिकांनी शिस्त पाळण्याची आवश्यकता
राजपथ, मोतीचौकात काही ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. तसेच पार्किंग करताना वाहने व्यवस्थित लावण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. मात्र, मुलांबाळांसह येणारे सातारकर यांची वाढती गर्दी त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यापुढे वाहतूक पोलिसांना हात टेकण्याची वेळ येत आहे. तसेच गर्दीत चोऱ्या होवू नयेत यासाठी दक्ष राहण्याचे आव्हान पोलीस दलाकडून पेलण्यात येत आहे. त्यासाठी खास बंदोबस्तही बाजारपेठांमध्ये तैनात करण्यात आला. तर साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही गर्दीवर लक्ष ठेवून आहेत.