– माधव विद्वांस
ज्यांच्या साहित्यावर अनेक संशोधकांनी पीएच.डी. केली असे तमाशा क्षेत्रातील भूषण पठ्ठे बापूराव यांचा आज जन्मदिन. पठ्ठे बापूराव यांचे मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1866 रोजी हरणाक्ष रेठरे, तालुका वाळवे, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच कविता करायचा छंद होता. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यांनी त्यातही बदल केले व या ओव्या “श्रीधरची गाणी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्याबद्दल औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. त्यामुळे त्यांचे शिक्षण औंध येथे झाले. त्यानंतर राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे ते संस्कृत भाषा शिकले. परंतु आई-वडिलांचे निधन झाल्याने ते गावी परत आले. त्यांचे शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत झाले होते. तमाशाच्या आवडीमुळे त्यांनी व्यवसाय, संसार सोडून दिला.
सुरुवातीस पठ्ठे बापूराव तहसील कचेरीत बसून लोकांचे अर्ज दस्त लिहून द्यायचे. त्यांच्याकडे एक बाई दस्त लिहिण्यासाठी आली. तिचा दस्त राहिला बाजूला आणि तिच्याकडे बघून त्यांना कविता सुचली! तीळ शोभे गोरा लाल –तुझी नथनी झुबकेदार! आणि त्यांनी त्या ओळी दस्तावर लिहिल्या आणि कागद साहेबांपुढे तसाच गेला… पुढे काय झाले याची कल्पना वाचकांना आली असेलच.
गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरांच्या कानावर त्या फडातील तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद, त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. त्यांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इत्यादी प्रकारच्या लावण्या रचिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि गीते गायली जाऊ लागली. मी ब्राह्मण असूनी! सोवळे ठेवले घालूनि घडी! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी!’ या जिद्दीने बापूराव घराबाहेर पडले.
गावोगावी तमाशाचा फड गर्दी खेचू लागले व श्रीधरऐवजी “पठ्ठे बापूराव’ म्हणून चाहते त्यांना ओळखू लागले. मुंबईत गावाकडची माणसे नोकरीसाठी येऊ लागली होती. त्यांच्या करमणुकीसाठी बापू मुंबईत आले व बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम सुरू झाले. याच वेळी त्यांना नामा धुलवडकरांच्या फडातील मस्तानी अर्थात पवळा भेटली. बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या लावण्याने अधिक बहरू लागली. बापू आणि पवळा या जोडीची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली. त्यांनी स्वत:चा फड काढला. त्याकाळी दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. छत्रपती शाहू महाराजांसमोर “मिठाराणी’चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला होता.
अचानक पवळा सोडून गेली आणि जेवढे वैभव त्यांनी उभे केले त्याला अवकळा आली. कली युगाचा ऐका दाखला! पठ्ठे बापूराव भुलला पवळिला!’ असे ठामपणे सांगणारे शाहीर हलाखीत दिवस काढू लागले. मात्र त्यांच्याच तमाशात काम करणाऱ्या “ताई परिंचेकर’ या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. पठ्ठे बापूरावांचे 22 डिसेंबर 1945 रोजी पुणे येथे निधन झाले.