सातारा – जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रांमध्ये नागरिकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे व क्रांती बोराटे, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. यापूर्वी 4 जानेवारी रोजी झालेल्या स्वच्छता बैठकीनुसार एक महिन्यामध्ये स्वच्छता सातत्य राखण्यासाठी गावस्तरावर 1148 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी 468 प्लॅस्टिक विक्रेते, दुकानदार व उघड्यावर कचरा फेकणारी व्यक्तींवर कारवाई करून 62,502 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 7586 विक्रेते व लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गावस्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत १332 गावांमध्ये प्लॅस्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.
तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 298 ग्रामपंचायतींनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस ठाण्याला कळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यासाठी पुढील महिन्यामध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी. तसेच तालुका व जिल्हास्तरावरील भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन मोठ्या पंचायती, बाजाराची गावे, पर्यटन स्थळे याठिकाणी कडक कारवाई करावी, प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात यावा. या कामासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी सहकार्य करावे, गावपातळीवर जनजागृतीची उपक्रम करून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम पथकांनी करावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.