सातारा – “स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई येथील झालेल्या कार्यक्रमास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, अभिनेते प्रेम चोप्रा, रोहित आर्य, विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील नऊ शाळांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी कचऱ्याची समस्या समोर येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे साथीचे आजारही पसरत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी व स्वच्छ समृद्ध भाग करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड करून “लेटस चेंज’ हा उपक्रम राबविला होता. वर्गांमध्ये स्वच्छता मॉनिटर झालेले विद्यार्थी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
अस्वच्छतेचे दुष्परिणामही समजावून सांगत कचरा कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. “स्वच्छता मॉनिटर’ या उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे धडे देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमात सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले आदींनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.