फलटण – विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह गुरुवार दि. २३ रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे फलटण तालुक्यामध्ये अनेक गावांत घरांची आणि पिकांची मोठी पडझड झाली असून शासकीय यंत्रणेद्वारे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे.
अलगुडेवाडी येथील अंकुश तुकाराम जाधव यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा केला आहे. कापडगाव येथील नाना तात्याबा करे यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असुन या घराचा पंचनामाही केला आहे. आंदरुड येथील धोंडीबा साधू चव्हाण यांच्या घराचे नुकसान झाले आहे. मिरेवाडी येथील यादव कोंडीबा चव्हाण यांच्या शेडची पडझड झाली आहे. रावडी खुर्दमधील गरीब मागासवर्गीय कुटुंबातील तरुण शेतकरी किशोर अशोक गायकवाड यांचे खूप नुकसान झाले आहे.
सरडे येथे वीज पडून मृत झालेला महाविद्यालयीन युवक ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले याचे आईवडील तसेच अन्य नातेवाइक (रा. जामखेड ता. जि. नगर) येथून फलटणला आले होते. याबाबत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून चार लाख रुपयांची मदतही मृत व्यक्तीच्या वारसांच्या नावे पुढील आठवड्यात थेट जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जाधव यांनी दिली.