कोयनानगर (प्रतिनिधी) – अर्धा जून महिना संपला तरी, मान्सूनचे आगमन न झाल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. धरणात सध्या केवळ 11.63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन, बिगरसिंचन प्रकल्पांसाठी आरक्षित असून, या आरक्षित साठ्यातून पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धरणातील पाणीसाठा पूर्वेकडे वापरण्यात येत असल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पाला घरघर लागली आहे. एक हजार मेगावॅट क्षमतेच्या चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद झाली आहे. 18 मेगावॅट क्षमतेचे पायथा वीजगृह सुरू आहे. उर्वरित टप्प्यांमधील वीजनिर्मितीदेखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
लांबलेला मान्सून व कडक उन्हाळ्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. धरणात सध्या फक्त 11.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणातील शिल्लक पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पांसाठी आरक्षित केल्याने, एक हजार मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प बंद केला आहे. वीजनिर्मितीचे अन्य प्रकल्पही काही मिनिटांसाठी सुरू करून, पुन्हा बंद करण्यात करत आहोत. पश्चिमेकडील वीजनिर्मिती 99 टक्के बंद आहे.
– संजय चोपडे(मुख्य अभियंता, कोयना जलविद्युत प्रकल्प)
धरणातील शिल्लक पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व बिगरसिंचन प्रकल्पांसाठी आरक्षित केला आहे. पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी देण्यात येत असल्याने धरणात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे पाणीकपात गरजेची असल्याने, धरणातून पाणी उपसाबंदी आदेश लागू करण्यात आला आहेत.
धरणातील 5.12 टीएमसी पाणीसाठा मृत असल्याने, केवळ 7.84 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. पाणीसाठा घटल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पांना घरघर लागली आहे.
एक हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा बंद करण्यात आला आहे. उर्वरित टप्प्यांमधील वीजनिर्मितीदेखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. सर्व वीजनिर्मिती प्रकल्प बंद झाल्यास राज्यातील उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती सुरू आहे.