वाठार स्टेशन – सातारा ते लोणंद राज्य मार्ग गेल्या आठ दिवसांपासून रेल्वे पूलाच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. तो आता पुन्हा खुला करण्यात आला आहे, अशी माहिती वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी दिली. वाठार स्टेशन हद्दीत असणारा काळी मोरी नावाचा जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल नवीन रेल्वे लाईन तयार करण्याकरिता पूर्णपणे पाडल्यानंतर नवीन बांधलेल्या पुलाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली होती. मात्र नवीन केलेल्या पुलाची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण झाल्याने सर्व वाहतूक पुर्ववत करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनामार्फत वाठार स्टेशन जवळच्या काळीमोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल डबल रेल्वे लाईन करण्यासाठी व जुन्या पुलाच्या समांतर बाजुला नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु नवीन पुलाची कामे अर्धवट राहिली होती. त्या कारणास्तव येणारी- जाणारी हलकी वाहने व जड वाहनांचा मार्ग आठ दिवसांसाठी बदलण्यात आला होता. परंतू मार्ग बदलल्याने स्थानिक वाहनधारकाची परवड होत होती. वाहनधारकांना तीन किलोमीटर अंतर जाण्यासाठी दहा किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागत होता.
वाहनधारकांना नाहक होणारा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक दिवस आधीच दोन्ही पुलांची कामे जलद गतीने पूर्ण केली असल्याने गुरुवारपासून या राज्य मार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यावेळी नवीन बांधलेल्या पुलावरून वाहतुकीच्या नियमाचे पालन करून वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन श्री. भोसले यांनी वाहनधारकांना केले आहे.