सातारा – गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पोहोचताच ग्रामस्थ आणि महिलांनी फटाके फोडून जल्लोष केला. पिढ्यान्पिढ्याचे स्वप्न साकार होत असल्याचे पाहून सर्वांनी डीजेवर ताल धरला. वचनपूर्ती करणार्या आमदार जयकुमार गोरे यांचा जयजयकार करण्यात आला. ग्रामस्थ आणि महिला आनंदाने पाण्यात डुंबल्या.
खटाव तालुक्यातील नेर धरणात आलेले जिहे-कठापूर योजनेचे पाणी सोमवारी (दि. 22) आंधळी बोगद्यातून माण तालुक्यात सोडण्यात आले. हे पाणी बुधवारी आंधळी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पोहचताच संपूर्ण गावाने जल्लोष केला. हजारो ग्रामस्थ आणि महिलांनी खणानारळाने ओटी भरुन जलपूजन केले.
पिढ्यान्पिढ्या फक्त पाण्याची आश्वासने ऐकणार्या जनतेला आमदार गोरे यांनी प्रत्यक्षात पाणी आणायचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी गेली 14 वर्षे अथक प्रयत्न केले होते. अनेक अडथळ्यांवर मात करून, अखेर जिहे-कठापूरचे पाणी माण तालुक्यात आणून त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आंधळी धरणात पाणी येताच माणदेशी जनतेचा उर आनंदाने भरून आला. अनेकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत बेभान होऊन, पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटला.
वचनपूर्ती आणि स्वप्नपूर्तीचा आनंद अवर्णनीय
आमच्या अनेक पिढ्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या. आमदार जयाभाऊंनी आम्हाला पाणी आणायचे स्वप्न दाखवले. त्यांच्या विश्वासावर आम्ही जिहे-कठापूरच्या पाण्याची चातकासारखी वाट पहात होतो. जयाभाऊंची वचनपूर्ती आणि आमची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे, अशी भावना ज्येष्ठ नेते अर्जुन काळे आणि सरपंच दादासाहेब काळे यांनी व्यक्त केली.